Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे विभक्त झालेले ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारने पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळांमध्ये तीन भाषांचा फॉर्म्युला लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनसे व शिवसेनेने (उद्धव ठाकरे) त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून या दोन्ही मराठी भाषिक पक्षांनी केलेल्या बॅनरबाजीमुळे राज्याचं राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, मनसेचे कार्यकर्ते राज्यभरातील शाळांमधील मुख्याध्यापकांशी संपर्क साधून मुलांना हिंदी भाषा न शिकविण्याचे आवाहन करीत आहेत. काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून हिंदी भाषेतील पाठ्यपुस्तकांची होळी करून प्रतीकात्मक निषेध नोंदवला जात आहे.
शिवसेना ठाकरे गटानेही राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू केलं असून राज्यावर हिंदी लादण्याचा सरकारचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही दिला आहे. मुंबईतील शिवसेना भवन परिसरात मनसे आणि शिवसेनेच्या (उद्धव गट) वतीने लावण्यात आलेल्या पोस्टर्समध्ये महाराष्ट्रावर हिंदी लादली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्यातील सत्ताधारी महायुतीचे सरकार हे महाराष्ट्रद्वेषी आहे, अशी टीकाही त्यातून करण्यात आली आहे.
यादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या गटानं ‘मोठा राजकीय बदल’ होण्याचे संकेतही दिले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी हिंदीच्या मुद्द्यावरून स्पष्टीकरण दिलं आहे. “आधी हिंदी भाषा अनिवार्य केली गेली होती, परंतु आता सुधारित शासन निर्णयानुसार ती सक्ती हटवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता तिसरी भाषा म्हणून कोणतीही भारतीय भाषा निवडण्याचा पर्याय आहे”, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
हिंदीवरून मनसे-ठाकरे गटाने सरकारला कसं लक्ष्य केलं?
- एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, मनसेने लावलेल्या बॅनरमध्ये असं लिहिलंय की, परराज्यातून आलेल्यांवर मराठी लादण्याऐवजी मराठी माणसांवर हिंदी लादली जात आहे.
- याआधी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यातील शाळांमध्ये फक्त मराठी व इंग्रजी या भाषा शिकविण्याचे धोरण राबविण्याची विनंती केली होती.
- दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने लावलेल्या बॅनर्सवर लवकरच महाराष्ट्रात राजकीय समीकरणं बदलतील, असा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
- महाराष्ट्रात मोठा राजकीय बदल होऊन ठाकरे सरकार लवकरच परत येईल, असं ठाकरे गटानं शिवसेना भवनाबाहेर लावलेल्या बॅनर्समध्ये म्हटलं आहे.
- राज्यात सत्ताबदल होऊन पुन्हा ठाकरे सरकार येणार या शिवसेना ठाकरे गटाच्या बॅनरबाजीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
- या वादग्रस्त तीन भाषा धोरणाच्या (NEP अंतर्गत) विरोधात मनसे व ठाकरे गटानं सोशल मीडियावरूनही जोरदार आवाज उठवला आहे.
आणखी वाचा : सोनिया गांधी यांच्या इराणवरील ‘त्या’ लेखामुळे वादंग का उठला? भाजपाचे नेते कशामुळे आक्रमक झाले?
आदित्य ठाकरेंनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?
शिवसेना (उद्धव गट) नेते आदित्य ठाकरे यांनी शनिवारी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. “मराठी आणि मुंबईबद्दलच्या प्रश्नांवर तुम्ही शांत बसता की, पेटून उठता याचाच अंदाज आज आला आणि प्रतिसाद पाहून खात्री पटली की, मुंबईकर मराठी माणूस एकवटला, तर मुंबईवरचं प्रत्येक संकट, अन्याय, दडपशाही आपण मिळून मोडून काढू!”, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. “लढा आपल्या मुंबईचा’ सुरू झालाय. मुंबईच्या प्रश्नांसाठी आम्ही लढत आलोय आणि लढत राहणार, त्यात तुमची खंबीर साथ मिळेल ह्याची खात्री आहे! आपण मिळून आपल्या मुंबईला आणि मराठीला ह्या महाराष्ट्रद्वेष्ट्या राजवटीच्या तावडीतून सोडवूया”, असं आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

मनसेची हिंदीबाबतची भूमिका काय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना एक पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी हिंदी भाषा सक्तीच्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका, असं आवाहन मुख्याध्यापकांना केलं. ते म्हणाले होते की, जर शाळांनी सरकारच्या या गुप्त अजेंड्याला पाठिंबा दिला तर मनसे याला महाराष्ट्राच्या विरोधात केलेली विश्वासघातकी कृती मानेल. परंतु, तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलेत, तर आम्ही तुमच्यामागे पहाडासारखे उभे राहू, असे आश्वासनही त्यांनी मुख्याध्यापकांना दिलं. त्याआधी राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला. “गुजरातमध्ये हिंदी सक्तीची नाही. हिंदी ही एका राज्याची भाषा आहे. मग महाराष्ट्रातच तिची सक्ती का? उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे का? हे प्रकार खपवून घेणार नाही. हिंदी लादली, तर मराठीवर कायमचा वरवंटा फिरेल”, असे राज ठाकरे म्हणाले होते.
हेही वाचा : ठाकरे गट की भाजपा, मनसेबरोबरची युती कुणासाठी फायदेशीर? आकडेवारी काय सांगते?
शिवसेना ठाकरे गटाची भूमिका काय?
१९ जूनला शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मनसेबरोबर युती करण्याचा पुनरुच्चार केला. त्याशिवाय ती होऊ नये म्हणून भाजपा आणि शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवसैनिकांना संबोधित करताना ठाकरे म्हणाले, “मनसे-शिवसेना यांच्यात युती होणार आहे की नाही याबाबत बातम्या सुरू आहेत; पण जे राज्याच्या मनात आहे, तेच मी करणार आहे.” उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला की, त्यांनी जर ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. मराठी पक्षांची युती होऊ नये म्हणून हॉटेलांमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी गुप्त बैठका घेतल्या जात आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
ठाकरे बंधू एकत्र येणार का?
महाराष्ट्रावर लादल्या जाणाऱ्या हिंदी भाषेचा मुद्दा उपस्थित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यात हिंदी लादण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. भाजपा मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठी आणि हिंदी भाषकांमध्ये फूट पाडण्याचा डाव खेळत आहे; पण मुंबई महापालिका पुन्हा आमच्याच ताब्यात येईल.” दरम्यान, हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू महायुती सरकारवर टीकेचा भडिमार करताना दिसून येत आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ते एकत्र येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.