जळगाव: शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते खासदार संजय राऊत हे शुक्रवारपासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, विमानतळावर उतरल्यानंतर योगायोगाने तेथील प्रतिक्षा कक्षात उपस्थित असलेले माजी मंत्री सुरेश जैन यांची भेट त्यांनी घेतली. त्यावरून जैन यांच्या भेटीचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न ठाकरे गट करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. वैयक्तिक जैन यांनी मात्र आपण राजकारणात पुन्हा सक्रीय होणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची व्यूहरचना आखण्याच्या उद्देशाने पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे शुक्रवारी रात्री मुंबईहून विमानाने जळगावी दाखल झाले. त्याचवेळी विमानतळावरील प्रतिक्षा कक्षात आधीच थांबून असलेले माजी मंत्री सुरेश जैन आणि त्यांची औपचारीक भेट झाली. एकेकाळी शिवसेनेचे नेते आणि मंत्री असलेले जैन भेटल्यानंतर राऊत यांनी त्यांची आस्थेवाईक चौकशी केली.सुरेश जैन आमचे जुने नेते आणि मार्गदर्शक आहेत. ते अजून थकलेले नाहीत, असे राऊत म्हणाले. आमच्या दोघांमधील आगामी निवडणुकांच्या चर्चेबाबत तुम्हाला लवकरच कळेल, असे विरोधकांना कोड्यात टाकणारे वक्तव्य राऊत यांनी केले.

दुसरीकडे, संजय राऊत आमचे जुने मित्र आहेत. त्यामुळे त्यांची सदिच्छा भेट घेतली. राजकीय विषयावर कोणतीच चर्चा आमच्यामध्ये झालेली नाही. राजकारणातही मी पुन्हा सक्रीय होणार नसल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री जैन यांनी दिली. याप्रसंगी ठाकरे गटाचे जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत हे देखील उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असताना, शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून आपल्या छायाचित्राचा वापर मते काबीज करण्यासाठी केला जात असल्याचे लक्षात घेऊन सुरेश जैन यांनी ठाकरे गटाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. तसेच आपण सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात, तीच संधी साधून भाजपने लोकसभेच्या जळगावसह रावेरमधील उमेदवारांना त्यांचा पाठींबा मिळावा म्हणून प्रयत्न केले होते. त्यानुसार, निवडणुकीचा प्रचार संपण्याच्या काही वेळेआधी त्यांचा पाठींबा मिळविण्यात भाजपला यश सुद्धा आले होते. त्यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी सुरेश जैन यांच्यावर नक्कीच कोणाचा तरी दबाव असल्याचा आरोप केला होता. मात्र, आता पुन्हा जळगाव महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ठाकरे गटाने माजी मंत्री जैन हे आमचे जुने नेते व मार्गदर्शक असल्याचे सांगत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.