१९९० साली घडलेल्या एका घटनेने चौधरी बाबुलाल यांना त्यांच्या जाट समाजातील एक नेता म्हणून प्रस्थापित केले. आता तीन वेळा आमदार आणि एकेकाळचे खासदार राहिलेल्या बाबूलाल यांना कायदेशीर दिलासा मिळाला आहे. तीन दशकांपूर्वी जाट समाजाच्या सदस्यांनी दलित समाजाच्या विवाह मिरवणुकीवर हल्ला केला होता. या हल्ल्याप्रकरणी आग्र्याच्या स्थानिक न्यायालयाने फतेहपूर सिक्रीमधील बाबूलाल यांच्यासह इतर सात जणांना संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले.

जून १९९० मध्ये भरत सिंह या व्यक्तीच्या बहिणीचे लग्न होते. ज्यावर हल्ला झाला होता. सिंह आता ६४ वर्षांचे आहेत आणि त्यांच्या कुटुंबाने सूडाच्या भीतीने त्यांचे मूळ गाव पनवारी सोडले.त्यानंतर बाबूलाल यांनी मागे वळून पाहिले नाही. तोपर्यंत फक्त ब्लॉक प्रमुख स्तरावरील नेता अशी त्यांची ओळख होती. त्यांनी १९९६ मध्ये मोठ्या प्रमाणात जाट लोकसंख्या असलेल्या फतेहपूर सिक्री विधानसभा जागेवरून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकली. २००२ मध्ये ते आरएलडीच्या तिकिटावर उभे राहिले आणि पुन्हा विजयी झाले. मात्र २००७ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. २०१४ मध्ये त्यांनी भाजपामधून निवडणूक लढवली आणि पुन्हा विजयी झाले. २०१४ मध्ये फतेहपूर सिक्री लोकसभा मतदार संघामधून निवडून आले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रतिस्पर्धी  उमेदवाराच्या जवळपास दुप्पट मते मिळवून विधानसभा मतदारसंघ जिंकला.

भरत सिंह यांची बहीण मुंद्रा देवी यांची वरात त्यांच्या गावातून जाऊ शकत नाही, असे जाट समुदायाच्या सदस्यांनी जाहीर केल्याने पनवारी तणाव सुरू झाला होता. त्यांच्या जाटबहुल गावात याला कधीच परवानगी नव्हती, असा त्यांचा युक्तिवाद होता. मुंद्रा देवी यांचे शेजारच्या गावातील तरुणाशी लग्न होणार होते.

भरत सिंह यांचे वडील चोकेलाल यांनी पोलिस आणि जिल्हा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी मदतीचे आश्वासन दिले. पहिल्यांदा २१ जून १९६० रोजी अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले होते. पण त्यांना लाठ्या आणि बंदुक घेऊन जाट समाजाच्या सदस्यांनी घेराव घातला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही समाजातील वरिष्ठांशी चर्चा केली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्नाची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आला. जाटांनी कोणताही अडथळा निर्माण न करण्याचे आश्वासन दिले, असे फिर्यादी पक्षाने न्यायालयात सांगितले.

मात्र २२ जून रोजी वरात भरत सिंह यांच्या निवासस्थानी पोचताच जाट समाजातील हजारो लोक तिथे जमले आणि त्यांनी वरातीवर हल्ला केला आणि त्यांना शिवीगाळ केली, तिथे उपस्थित असलेले पोलीस अधिकारी मदत करू शकले नाहीत. फिर्यादीने न्यायालयाला सांगितले की, लाऊडस्पीकरच्या सहाय्याने जमा झालेल्या जमावामध्ये शेजारील गावातील लोकांचा समावेश होता.  त्यांनी पनवारी गावातील किमान १५ दलित कुटुंबांची घरे जाळली.त्यामध्ये भरत सिंह यांचाही समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिरिक्त पोलिस फौजफाटा परिसरात दाखल झाला. “पोलिसांनी गोळीबार करण्यापूर्वी रबराच्या गोळ्या झाडल्या आणि अश्रूधुराच्या नळकांड्याही सोडल्या. लोक पांगल्यानंतर पोलिसांना एक मृतदेह सापडला. त्यानंतर पोलीस संरक्षणात विवाह सोहळा पार पडला. हा हिंसाचार जिल्ह्याच्या इतर भागातही पसरला,” असे फिर्यादीने सांगितले. याच प्रकरणात बाबूलाल यांच्यासह सात जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. मात्र आता न्यायालयाने पुराव्या अभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे