मुंबई : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‘वंचित बहुजन आघाडी’च्या पाठिंब्यात मागच्या तीन निवडणुकांमध्ये झपाटयाने घसरण झाल्याने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने आपला पारंपरिक मतदार असलेल्या बौद्ध समाजाला पुन्हा हाक दिली आहे. त्यासाठी पक्षाने राज्यभर बौद्ध समाज संवाद यात्रेस प्रारंभ केला आहे.

‘वंचित’चा पहिला बौद्ध समाज संवाद मेळावा अकोला येथे नुकताच पार पडला. ११ ऑक्टोबपर्यंत ‘वंचित’चे बौद्ध समाज संवाद मेळावे राज्यात होणार आहेत. त्यासाठी पक्षाने बौद्ध महासभा, भारिप बहुजन पक्ष, समता सैनिक दल, सम्यक विद्यार्थी आंदोलन, समाजाच्या कामगार संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांशी बैठकांचे सत्र चालवले आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जातीबाहेर व्यापक राजकारण करण्याचा प्रयत्न कायम केलेला आहे. त्यातून त्यांचा ‘धनगर-बौद्ध- मुस्लीम’ युतीचा ‘अकोला पॅटर्न’ पुढे आला. २०१८ मध्ये भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघ या आपल्या पक्षाला बाजूला ठेवत अ‍ॅड. आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. त्यातून त्यांनी दलितांबरोबरच ओबीसी, अल्पसंख्याक, धनगर, वंजारी व सवर्ण जातीमधील गरीब जात समुदायाला बरोबर घेत ८ टक्के पर्यंत मते घेण्यात यश मिळवले.

हेही वाचा >>> शिंदेंना झुकते माप, भाजपमध्ये खदखद? मेट्रो-३ चा समारंभ ठाण्यात घेतल्याने नाराजी 

२०१९ च्या लोकसभेला तब्बल ‘वंचित’ला ४७ लाख (७.४ टक्के) मते मिळाली. त्याचवर्षी झालेल्या विधानसभेला वंचितचा पाठिंबा २५ लाख (४.६ टक्के) मतांवर आला. २०२४ च्या लोकसभेला हा मतटक्का आणखी घसरत १५ लाखांवर (२.८ टक्के) आला आहे. परिणामी, राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘वंचित’ने आपल्या पारंपारिक मतदारांशी संवाद साधण्यास प्रारंभ केला आहे.

राज्यात १ कोटी ६० लाख बौद्ध समाजाचे मतदान आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दलित मतदार महाविकास आघाडीच्या मागे राहिला होता. अनुसूचित जातीच्या उप वर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाने इतक्यात मंजुरी दिली आहे. परिणामी अनुसूचित जात गटातील ‘हिंदू दलित जाती’ भाजपच्या मागे जाण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ‘वंचित’चे बौद्ध समाज संवाद मेळावे होत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खैरलांजीत स्मारक बनवावे

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातच्या खैरलांजी गावात २००६ मध्ये दलित भोतमांगे कुटुंबातील ४ व्यक्तींची भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या कुटुंबाच्या बेवारस असलेल्या झोपडीचे स्मारकात रुपांतर करावे, अशी मागणी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच बांगलादेशातील बौद्ध नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात आंबेडकर यांनी चिंता व्यक्त केली आहे.