चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपली. शेवटच्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात बंडखोरांचे अक्षरक्षः पीक आल्याचे समोर आले. महायुती आणि महाविकास आघाडीत बंडोबांची संख्या मोठी असल्याचे पाहायला मिळतेय. आपापल्या पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावून बसलेल्या अनेक नेत्यांचा अपेक्षाभंग झाला. यापैकी काहींची समजूत काढली गेली, तर काहींनी बंडाचा झेंडा उभारलाय. आता या बंडोबांचा थंडोबा करण्याचे आव्हान काँग्रेस आणि भाजपसमोर आहे.

जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, वरोरा या चार मतदारसंघांत काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षात बंडखोरीचे पीक आले आहे. चंद्रपूर या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून काँग्रेसने बौद्ध समाजातून येणाऱ्या अतिशय सामान्य कार्यकर्ता प्रवीण पडवेकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले राजू झोडे यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना खासदार प्रतिभा धानोरकर यांचा आशीर्वाद आहे. भाजपने अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना आयात करून उमेदवारी दिल्याने ३० वर्षांपासून भाजपशी एकनिष्ठ असलेल्या ब्रिजभूषण पाझारे यांनी बंडाचा झेंडा उगारत अर्ज दाखल केला.

बल्लारपूर मतदारसंघात काँग्रेसने ओबीसी महिला डॉ. अभिलाषा गावतुरे यांना डावलून चंद्रपूर बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज डॉ. गावतुरे दाम्पत्याने बंडखोरी करीत अर्ज दाखल केले. राजुरा मतदारसंघात भाजपमध्ये तीव्र बंडखोरी बघायला मिळत आहे. येथे भाजपने देवराव भोंगळे यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे नाराज झालेल्या भाजपच्याच दोन माजी आमदार ॲड. संजय धोटे व सुदर्शन निमकर यांनी अर्ज दाखल केले. त्यांच्या पाठिशी कोण आहेत, असा प्रश्न येथे सर्वांनाच पडला आहे.

राजुरा येथे भाजपत झालेले बंड शमले नाही तर त्याचा परिणाम चंद्रपूर मतदारसंघावर होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राजुरा व चंद्रपूर या दोन्ही मतदारसंघांतील बंडाची दाखल स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून ते यावर लक्ष ठेऊन असल्याची माहिती आहे.

वरोरा येथे तर काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांत बंडखोरी झाली आहे. काँग्रेसने खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या बंधूप्रेमाला नको तितके महत्त्व दिल्याने खासदारांचे भासरे अनिल धानोरकर यांनी वंचित आघाडीकडून उमेदवारी दाखल केली आहे. मी नाही तर काकडेपण नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तसेच काँग्रेसचे डॉ. चेतन खुटेमाटे यांनी बंड पुकारत प्रचाराचा धुरळा उडवला आहे. काँग्रेस पक्षाकडून निष्ठावान सामान्य कार्यकर्त्याऐवजी नातेवाईक, कुटुंबांतील सदस्याला महत्त्व दिले जाते, अशी भावना मतदार व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची झाली आहे. काँग्रेसच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याची तक्रार थेट राहुल गांधी यांच्याकडे केली आहे.

हे ही वाचा… पुणेकर बंडखोरांना ‘योग्य जागा’ दाखवितात!

भाजपने ‌वरोऱ्यात रमेश राजूरकर यांना निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले व उमेदवारी मात्र माजी मंत्री संजय देवतळे यांच्या पुत्राला दिली. त्यामुळे दुखावलेल्या राजूरकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. ते सध्या मनसेच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. राजूरकर यांची समजूत घालण्यासाठी स्वतः माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर प्रयत्नरत आहेत. अहीर त्यांच्या घरी जावून आले. एवढेच नाही तर वरिष्ठ पातळीवरदेखील प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चिमूर व ब्रम्हपुरी या दोन मतदारसंघांत काँग्रेस व भाजपमध्ये बंडखोरी झाल्याचे दिसत नसले तरी, उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराजांची संख्या जास्तच आहे. महाविकास आघाडी व महायुतीत सहभागी मित्रपक्षांच्या नेत्यांनी, जिल्हाप्रमुखांनी बंड पुकारत अधिकृत उमेदवारांविरोधात अर्ज दाखल केले आहे.