छत्रपती संभाजीनगर : सत्तेतील नेत्यांनाच मतदारही कामे सांगतील परिणामी अडगळीत पडू या मानसिकतेतून आलेल्या निराशेपोटी छत्रपती संभाजीनगरमधील माजी नगरसेवक आणि शिवसैनिक एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारत आहेत. महापालिका निवडणुकापूर्वी यामध्ये आणखी भरच पडेल असा दावा केला जात आहे. महापालिका बरखास्त होऊन आता चार वर्षे नऊ महिने झाले आहेत. त्यामुळे ‘ विकास निधी’ ही माजी नगरसेवकांच्या हाती नसल्याने राजकीय आघाडीवर सारेजण गपचूप बसून होते. पुढील काळात किमान सत्तेतील नेत्यांबरोबर राहिलो तर वार्डातील नेतेपण टिकवून ठेवण्याच्या धडपडीतून पक्षांतरे होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने बदलेल्या ‘ हिंदूत्त्वाची’ व्याख्या छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरात उपयाेगी पडणार नाही, असे नगरसेवक शिवसेना नेत्यांना वारंवार सांगत होते. शहरात ‘ एमआयएम’ चा प्रभाव असणाऱ्या पट्ट्यातून ठाकरे गटाच्या नेत्यांना मते मिळतील असा दावा केला जात होता. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी तर मुस्लिम भागातील त्यांचा संपर्कही वाढवला होता. त्यांच्या कार्यालयात मुस्लिम कार्यकर्त्यांची उठबस सुरू झाली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये ते पराभूत झाले. विधानसभा निवडणुकीमध्येही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षास जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात अपयशच पदरी पडले. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह टिकून रहावा म्हणून शहरातील सर्व वार्डात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी बैठका घेण्यास सुरुवात केली. मात्र, पुढील पाच वर्षे सत्ताविरोध करताना येणाऱ्या ‘ निधी’ च्या अडचणी कशा सोडवायच्या या प्रश्नाचे उत्तर नेत्यांना देता येत नव्हते. परिणामी कार्यकर्त्यांची गळती सुरू झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी महापौर, महिला आघाडीच्या नेत्या, माजीनगरसेवक यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षास सोडण्यास सुरुवात केली. ऐन निवडणुकीमध्ये उमेदवार असणाऱ्या किशनचंद तनवाणी यांनी पक्ष सोडल्यानंतरही ठाकरे गटातून प्रतिक्रिया उमटली नाही. तेव्हापासून ठाकरे गटास गळती लागली. ती थांबवण्यात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांना यश आले नाही. उलट या दोन नेत्यांमधील वाद मिटता मिटत नाहीत, अशा जाहीर तक्रारी शिवसैनिकांनी केल्या. त्यामुळे ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना रोखून धरणारा बंधच शिल्लक नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या प्रक्रियेला आणखी वेग दिला जाण्याची शक्यता आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याबरोबर आमदार प्रदीप जैस्वाल यांनीही आता पुढाकार घेत दहा माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश घडवून आणल्याने महापालिका निवडणुकीची तयारी जोर पकडू लागली असल्याचे दिसून येत आहे.