नोटबंदीनंतरही पिंपरी-चिंचवडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन हजार व पाचशेच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना राजकीय पक्षांना विशेषत: निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना मात्र कोणत्याही प्रकारे झळ बसली नसावी, असेच चित्र पिंपरी-चिंचवडमध्ये प्रकर्षांने दिसून येत आहे. निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून सध्या होणारी पैशांची प्रचंड उधळपट्टी पाहून सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत. एवढा पैसा या मंडळींकडे येतोय कुठून, असा प्रश्न आता अनेकांना पडू लागला आहे. ‘मतदार राजा’पर्यंत पोहोचण्यासाठी, त्याला खूश करण्यासाठी शहरात सध्या लहान कार्यक्रमांपासून ते भव्य-दिव्य कार्यक्रमांचा धडाका सुरू आहे. त्यासाठी सिनेनाटय़ क्षेत्रातील कलावंतांच्या लोकप्रियतेचा उपयोग करून घेतला जात आहे. ‘चला हवा येऊ द्या’ टीममधील भाऊ, कुशल, भारत, सागर, श्रेया ही टीम असो, की ‘होम मिनिस्टर’ वाले आदेश भावोजी यांना सर्वाधिक मागणी आहे. त्यांच्या कार्यक्रमांना गर्दी आणि खर्च खूपच मोठय़ा प्रमाणात करावा लागतो आहे. याशिवाय, खर्चिक ‘बालमेळावे’, ‘संगीत रजनी’, विविध कला-क्रीडा स्पर्धाचे आयोजन, वाढदिवसाच्या नावाखाली जेवणावळी, ‘थर्टी फर्स्ट’प्रमाणे ओल्या पाटर्य़ा असे एक ना अनेक उपद्व्याप इच्छुक उमेदवारांकडून सुरू आहेत. त्यासाठी लाखो-करोडो रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. राजकीय पक्षांच्या मुलाखती, मेळावे, आंदोलने, नेत्यांची बडदास्त असे विविध कार्यक्रम सुरू आहेत, त्यासाठी खर्च होतोच आहे. चलनातील जुन्या नोटा वापरता येत नाहीत. नव्या नोटा मिळत नाहीत. जर मिळाल्याच तर दोन हजार, चार हजारांच्या मर्यादा आहेत. बँका, एटीएमला लांब रांगा आहेत. अशा परिस्थितीत, उमेदवार व राजकीय पक्षांकडे एवढा पैसा येतो कुठून, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.