उसतोड कामगारांचा संप मागे घेण्यात आला आहे. तर दिवसभर झालेल्या चर्चेनंतर उसतोड कामगारांच्या मजुरीत सरासरी १४ टक्के दरवाढ देण्यात आली आहे. प्रतिटन ३५ ते ४० रुपयांची वाढ मिळाली आहे.साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी ही माहिती दिली आहे.   पुण्यात उसतोड मजुरांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला धनंजय मुंडे, बाळासाहेब थोरात, पंकजा मुंडे, सुरेश धस हे सर्वजण उपस्थित होते. यावेळी राज्यातील ऊस तोडणी आणि ऊस वाहतूकदारांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

उसतोड कामगारांना १४ टक्के वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ३५ ते ४० रुपये उसतोड कामगांना जास्त मिळतील. यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना ३०० ते ३५९ कोटी रुपये त्यासाठी द्यावे लागणार आहे. अशी माहिती साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली.

यावेळी सुरेश धस म्हणाले की, उसतोड मजुरांच्या प्रश्नावर आज पुण्यात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. तसेच शरद पवार साहेब आणि गोपीनाथ मुंडे साहेब यांनी आजवर झालेल्या बैठकीत बोलवले आहे. समस्या समजून घेतले असून कधीही अन्याय केला नाही. मात्र आज बैठकी पूर्वी बोलवले नसल्याने मला आंदोलन करावे लागले. त्यानंतर अखेर बैठकीला बोलविण्यात आले. त्यामध्ये उस तोड मजुरांच्या समस्या मांडल्या.

काय म्हणाले धनंजय मुंडे ?
आजच्या बैठकीत जो निर्णय झाला आहे. तो सर्वांच्या दृष्टीने समाधानकारक आहे. तसेच आजच्या बैठकीत जे झालं, त्याबाबत उसतोड कामगाराचा मुलगा म्हणून आज जी वाढ मिळाली. त्यावर मी समाधानी असून कारखान्यांवर उसतोड मजुरांचं पोट आहे. त्या दृष्टीने अनेक निर्णय झाले आहे. कारखान्यांची परिस्थितीही चांगली व्हावी. पण जे आज काही झाले हे पाहून खरे मुकादम कोण आहेत हे आम्हाला नावानिशी माहिती आहे.