‘शिडीशिवाय फासे पलटवू’ या देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा राज्याचे मंत्री सुभाष देसाई यांनी आज समाचार घेतला. “फडणवीस हे स्वप्न बघत आहेत. त्यांना आणखी पाच वर्षे स्वप्न बघावं लागेल. महाविकास आघाडी सरकारचे आणखी पाच वर्षे बाकी आहेत. हे सरकार स्थिर आहे,” असं म्हणत देसाई यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. पिंपरी-चिंचवडमधील सिम्बॉयसिस स्किल अँड प्रोफेशनल विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभास उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संवाद साधला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये जाहीर भाषणामध्ये शिडीशिवाय आम्ही फासे पलटवू आणि हे फासे खूप मोठे असतील, असं म्हणत राज्य सरकारबद्दल भाष्य केलं होतं. त्यावर मंत्री सुभाष देसाई यांनी प्रतिक्रिया दिली.

सुभाष देसाई म्हणाले, “फडणवीस यांना पाच वर्षे स्वप्न बघावं लागेल. महाविकास आघाडी सरकारचे एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यांना आणखी चार वर्षे थांबावं लागेल. असे अंदाज व्यक्त करण्यापलीकडे त्यांच्या हातात काही नाही. महाविकास आघाडीचे सरकार स्थिर झालेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेनं विश्वास दाखवला आहे. त्यामुळं आम्ही पाच वर्षे पूर्ण करू ही खात्री आहे,” असं देसाई म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात नाराजी नाही. नाना पटोले हे अधिक काळ अध्यक्ष म्हणून हवे होते. इतकं चांगलं काम त्यांचं चाललं होतं. परंतु, त्यांचे पक्षांतर्गत काम करण्याचा विचार असल्यामुळे दुसऱ्या पदावर जाण्यासाठी अध्यक्ष पद रिक्त केलं आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा. कुठल्याही पदावर गेले तरी त्यांच्याकडून महाराष्ट्राची सेवाच होईल,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.