महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या गुणपत्रिका १७ ऑगस्टपासून देण्यात येणार आहेत. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठरावीक दिवशीच गुणपत्रिका नेण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर करू नये, अशी सूचना राज्य मंडळाने शाळांना दिली आहे.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रत्येक वितरण केंद्राला जोडलेल्या शाळांची संख्या लक्षात घेऊन जास्त वितरण केंद्रे निर्माण करणे किंवा त्याच वितरण केंद्रावर सुरक्षित अंतर ठेवून वितरण खिडक्यांची संख्या वाढवून गुणपत्रिका वितरित कराव्यात. विभागीय मंडळाकडून शाळांना १४ ऑगस्ट आणि १७ ऑगस्टला गुणपत्रिका वितरित करण्यासाठी दिल्या जातील. तर १७ ऑगस्टपासून शाळांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार शासनाच्या नियमांचे पालन करून गुणपत्रिक विद्यार्थ्यांना द्याव्यात. विद्यार्थ्यांनी ठरावीक दिवशीच शाळेत येऊन गुणपत्रिका घेण्याची सक्ती करण्यात येऊ नये, शाळांमध्ये पालक-विद्यार्थ्यांची एकाच वेळी गर्दी न होण्याबाबत नियोजन करावे, असे आदेश राज्य मंडळाचे सचिव डॉ. भोसले यांनी विभागीय मंडळाच्या सचिवांना दिले आहेत.