सामनातील लिखाणाविरोधात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या वर्तमानपत्राच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना एक तक्रारवजा पत्र लिहिलं. यावरुन सामनातून पाटील यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्राला नवा पत्रमहर्षी लाभला असल्याचं सामनानं म्हटलं आहे. या टीकेवर भाष्य करताना आपण रश्मी वहिनींकडे तक्रार करणार असं मी म्हटलंच नव्हतं, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.

“रश्मी वहिनींकडे तक्रार करणार असं मी म्हटलंच नाही. रश्मी वहिनी या सुसंस्कृत महिला संपादिका असताना सामनात त्यांच्या नावाने हे सर्व शब्द छापून येतात. त्यामुळे त्यांना हे शब्द चालतात का? हे विचारण्यासठी मी त्यांना पत्र लिहिलं होतं. तुम्हाला जर असे शब्द चालणार असतील तर माझी काही हरकत नाही, तुम्हाला शुभेच्छा असं मी त्यांना लिहिलेल्या पत्रात शेवटी म्हटलं होतं. त्यामुळे माझा विषय इथेच संपला,” असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

हिंदूच त्यांना धडा शिकवतील आम्ही फूट पाडण्याचा प्रश्नच येत नाही – पाटील

औरंगाबादच्या नामांतराचा विषय हा कोणीही राजकीय विषय करु नये. यावरुन महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा प्रश्नच येत नाही कारण हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी सांगावं की औरंगाबाद हे औरंगजेबाच्या नावावरुन पडलं आहे की अन्य कोणाच्या. इंग्रजांच्या काळातील पुतळे आणि इमारतीची नावही आपण बदलली. त्यामुळे ज्या व्यक्तीने आपल्यावर आक्रमण केलं, जुलून केले आशा व्यक्तीचं नाव आपण मिरवावं का? असा आमचा सवाल आहे. त्यामुळे ज्या हिंदूला या नावावर आक्षेप असेल तो त्यांना धडा शिकवेल, आम्हाला त्यांच्यात फूट पाडण्याचं कारणच नाही.

सामनातून चंद्रकांत पाटलांवर सडकून टीका

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेनेने सामना संपादकीयमधून जोरदार टीका केली आहे. चंद्रकांतदादांचे पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखे आहे. दादांनी पत्र लिहिणे म्हणजे सगळ्यांचीच दाणादाण उडणार. पुन्हा भाषाशुद्धीची मोहीम त्यांनी सुरूच केली आहे, असा टोला लगावताना महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला असल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे.