भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थच्या मैदानावर दुसरा कसोटी सामना १४ ते १८ डिसेंबर दरम्यान रंगला आहे. ४ सामन्यांच्या मालिकेत भारत १-० ने आघाडीवर आहे. विजयी लय कायम ठेवण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात खेळत आहे, तर मायभूमीत भारताकडून सलामीचाच कसोटी ऑस्ट्रेलियाने गमावला. त्यामुळे दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा ऑस्ट्रेलियन संघाचा मानस आहे. पण या सामन्यात नाणेफेकीचा डाव मात्र विराटच्या दिशेने झुकला नाही आणि त्याला नकोशा यादीत स्थान मिळाले.

सामना सुरु होण्याआधी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलदांजीचा निर्णय घेतला.

त्यामुळे विराट कोहलीने नाणेफेक गमावून एक विचित्र विक्रम केला. एकाच वर्षात विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये नवव्यांदा नाणेफेक गमावली. नाणेफेकीच्या बाबतीत विराट कोहली हा तिसऱ्या क्रमांकाचा कमनशिबी भारतीय कर्णधार ठरला. या आधी महेंद्रसिंग धोनी २०१० मध्ये १२ कसोटी सामन्यात नाणेफेक हरला होता, तर २००२ साली सौरव गांगुली ११ वेळा नाणेफेकीत पराभूत झाला होता.

दरम्यान, पहिले फलंदाजी करणारे ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फिंच आणि हॅरिस यांनी अतिशय सावध पवित्रा घेत डावाला सुरुवात केली. १५ व्या षटकात अर्धशतक गाठलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी त्यानंतर तर अधिक संथ खेळ केला. त्यामुळे उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २६ षटकात बिनबाद ६६ धावा इतकी झाली होती.