पुण्यामध्ये सध्या हेल्मेट सक्तीवरून चांगलाचा वाद निर्माण झाला आहे. १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती लागू केल्यानंतर पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्यांकडून दंड वसुली करण्यास सरुवात केली आहे. तर दुसरीकडे काहीही झाले तरी हेल्मेट घालणार नाही असा पवित्रा पुणेकरांनी घेतला आहे. मागील काही दिवसांपासून अनेक ठिकाणी पुण्यातील नागरिकांनी आंदोलन करुन हेल्मेट सक्तीला विरोध केला. याच पार्श्वभूमीवर लोकसत्ता ऑनलाइनने एक जनमत चाचणी घेतली होती. पुण्यात हेल्मेट सक्तीला होणारा विरोध योग्य आहे की आयोग्य यासंदर्भात वाचकांकडून त्यांची मते मागवण्यात आली होती. या जनमत चाचणीमध्ये ६६ टक्के वाचकांनी पुणेकरांचा विरोध चुकीचा असल्याचे मत नोंदवले आहे. तर ३४ टक्के लोकांनी हेल्मेट सक्तीला होणारा विरोध योग्य असल्याचे म्हटले आहे.

ट्विटवर घेण्यात आलेल्या जनमत चाचणीमध्ये एकूण एक हजार ५२२ जणांनी आपले मत नोंदवले. त्यापैकी ६६ टक्के म्हणजेच एक हजार ४ जणांनी पुणेकरांचा विरोध चुकीचा असल्याचे सांगत आपल्याला हा विरोध पटत नसल्याचे मत नोंदवले आहे. तर ५१८ जणांनी म्हणजेच ३४ टक्के वाचकांनी पुणेकरांची भूमिका योग्य असल्याचे सांगत या हेल्मेट सक्ती विरोधाला पाठिंबा दर्शवला आहे.

यावेळी मत नोंदवतानाच अनेकांनी कमेन्टसच्या माध्यमातून आपले मत मांडले आहे. लोकसत्ता ऑनलाइनचे वाचक असणारे अमोल जाधव याबद्दल आपल्या कमेन्टमध्ये म्हणतात, ‘हेल्मेट सक्तीला होणारा विरोध हा अतिशय अयोग्य आहे, हेल्मेट सक्ती दुचाकी चालवणाऱ्याच्या सुरक्षेसाठीच आहे, यात पुणे शहर पोलिसांचा कसलाही फायदा नाही, फायदा आहे तर तो दुचाकी चालवणाऱ्याचा. लक्षात राहू द्या की घरी आपली सगळे वाट बघतयात, कमीत कमी त्यांच्यासाठी तरी घाला’

तर राजन राजवाडे यांनी सर्वांना नियम सारखेच हवे असे सांगताना पुणेकरांचा विरोध चुकीचा असल्याचे मत आपल्या कमेन्टमधून मांडले आहे.

फेसबुकवर घेण्यात आलेल्या जनमत चाचणीमध्येही वाचकांनी पुणेकरांची भूमिका चुकीची असल्याचे मत नोंदवले आहे. ‘पुण्यात हेल्मेटसक्तीला होणारा विरोध योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?’ या प्रश्नावर ८४८ जणांनी आपले मत नोंदवले. त्यापैकी ६२ टक्के ५२५ म्हणजेच वाचकांनी हा विरोध चुकीचा असल्याचे मत नोंदवले तर ३२३ म्हणजेच ३८ टक्के जणांनी पुणेकरांच्या भूमिकेची पाठराखण केली आहे.

या जनमत चाचणीच्या निकालावरून असचं म्हणता येईल की लोकसत्ता ऑनलाइनच्या वाचकांनी पुणेकरांना हेल्मेट सक्तीला विरोध करण्याऐवजी सुवर्णमध्य साधून सुरक्षेच्या दृष्टीने त्याचा स्वीकार करावा अशी भूमिका मांडली आहे.