अमृतांजन पूल पाडणार

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल नव्या वर्षांत पाडण्यात येणार आहे. या पुलाबाबत नागरिकांकडून दाखल करण्यात आलेले सर्व दावे, हरकती निकाली काढण्यात आल्या असून नव्या वर्षांत निविदा प्रक्रिया राबवून हा पूल पाडण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमएसआरडीसी) देण्यात आली आहे.

लोणावळा ते खंडाळा दरम्यान द्रुतगती महामार्गाला जोडणारा तब्बल १८९ वर्षे जुना अमृतांजन पूल धोकादायक झाल्यामुळे पाडून नवा पूल बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तत्पूर्वी एमएसआरडीसीने कायदेशीर बाब म्हणून नागरिक, संस्थांकडून हरकती, सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार सर्व हरकती, सूचना निकाली काढण्यात आल्या आहेत.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गामध्ये असलेला हा पूल अपघाताचे केंद्र म्हणून नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. पर्यटनासाठी येणाऱ्या तरुण-तरुणींकडून या ठिकाणी धोकादायक पद्धतीने साहसी प्रात्यक्षिके करण्याचे प्रकार घडले आहेत. अशा घटनांमध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. सेल्फी घेण्यासाठी थांबवून नागरिकांकडून छायाचित्रे काढण्यात येतात. परिणामी, वाहतूककोंडी मोठय़ा प्रमाणात होते.

धोकादायक झाल्यामुळे हा जुना पूल पाडून नवा पूल उभारण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. दरम्यान, अमृतांजन पूल माझ्या मालकीच्या जागेत असल्याने तो पाडू नये, अशी कायदेशीर नोटिस एका व्यक्तीने एमएसआरडीसीच्या मुंबई कार्यालयात पाठवली होती. या नोटिशीची गंभीर दखल घेत एमएसआरडीसीकडून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागाकडून जागेच्या संदर्भात सविस्तर अहवाल मागवण्यात आला होता. ही हरकतही निकाली काढण्यात आली आहे.

अमृतांजन पूल पाडण्याबाबत सर्व पूर्वप्रक्रिया एमएसआरडीसीने पूर्ण केली आहे. पूल पाडण्याबाबत आलेल्या हरकती, सूचना, दावे निकाली काढण्यात आल्या आहेत. पूल पाडण्यासाठीची आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली असून याबाबतची निविदा नव्या वर्षांत काढण्यात येईल. – आ. प. नागरगोजे, अधीक्षक अभियंता, एमएसआरडीसी