डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी रद्द

प्रवासी मेटाकुटीला; एसटीची सेवा अपुरी

पुणे : पुणे-मुंबई दरम्यानच्या रेल्वे प्रवाशांचे हाल थांबण्याची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत. मध्य रेल्वेने संध्याकाळी उशिरा जाहीर केलेल्या निर्णयानुसार पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी आता १६ ऑगस्टपर्यंत रद्द राहणार आहेत. डेक्कन एक्स्प्रेस आणि प्रगती एक्स्प्रेस या गाडय़ाही ११ ऑगस्टपर्यंत धावणार नसल्याचे मध्य रेल्वेकडून कळविण्यात आले आहे. लांब पल्ल्याच्या विविध गाडय़ाही रद्द करण्यात आल्याने प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. रेल्वेच्या मुंबई आणि पुणे विभागासह इतर ठिकाणी पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे गाडय़ा रद्द कराव्या लागत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात येत आहे.

विविध ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने मध्य रेल्वेच्या मुंबई आणि पुणे विभागात तसेच मिरज-लोंडा (कर्नाटक) विभागात लोहमार्गावर पाणी येऊन ते खचले आहेत. काही ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार आहेत. परिणामी गेल्या आठवडय़ापासून पुणे-मुंबई लोहमार्गावरील तसेच अन्य लांब पल्ल्याच्या अनेक गाडय़ा रद्द करण्यात येत आहेत. काही गाडय़ा अंशत: सोडण्यात येत असून, काहींच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांचे नियोजन कोडमडले असून, त्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी एक्स्प्रेस या गाडय़ा ११ ऑगस्टपर्यंत रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर करण्यात आला होता. मात्र, या गाडय़ा १६ ऑगस्टपर्यंत रद्द ठेवण्याचा निर्णय दुसऱ्याच दिवशी घेण्यात आला आहे. डेक्कन एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस या गाडय़ाही गेल्या काही दिवसांपासून रद्द करण्यात येत आहेत. त्या आता ११ ऑगस्टपर्यंत रद्द राहणार आहेत. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे किंवा मुंबईहून पुण्याकडे येण्यासाठी ११ ऑगस्टपर्यंत एकही रेल्वे नाही. पुणे-मुंबई दरम्यान रोजचा प्रवास करण्याची आवश्यकता असणाऱ्यांनी एसटी बसचा आधार घेतला असला, तरी त्या पुरेशा प्रमाणात नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे खासगी वाहतूकदारांकडून अडलेल्या प्रवाशांची लूट होत असल्याचेही वास्तव आहे.

मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, सह्यद्री एक्स्प्रेस, पुणे-भुसावळ एक्स्प्रेस या गाडय़ाही ११ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.