ठाकरे सरकारने निर्बंध शिथिल करत अनलॉकबाबतची नवी नियमावली सोमवारी जाहीर केली. राज्य सरकारने राज्यभरातील २५ जिल्ह्यांना दिलासा दिला आहे. मात्र पुणे, साताऱ्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम ठेवले आहेत. या जिल्ह्यांत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असणार आहेत. पॉझिटीव्हिटी दर आणि दैनंदिन वाढती रुग्णसंख्या पाहता या जिल्ह्यांतील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन किती प्रमाणात कडक निर्बंध लावायचे त्याचा निर्णय घेणार आहे. मात्र या निर्णयावर पुण्यातील व्यापारी महासंघाने नाराजी व्यक्त केली आहे. यानिमित्ताने पुण्यात व्यापाऱ्यांकडून आंदोलनही करण्यात आलं. यावेळी व्यापाऱ्यांनी दुकाने सात वाजेपर्यंत सुरु ठेवणार असा निर्धार व्यक्त केला आहे. पुणे शहरातील व्यापारी वर्गाला रात्री सात वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाईल, अशी अपेक्षा शहरातील व्यापारी वर्गाला राज्य सरकारकडून होती. दिलासा न दिल्याच्या निषेधार्थ शहरातील व्यापाऱ्यांनी घंटानाद आंदोलन करून निषेध व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत दुकाने सुरू करण्याचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत न घेतल्यास आम्ही उद्यापासून सात वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवणार आहोत. एवढंच या सरकारने लक्षात ठेवावं. आम्ही कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहोत असा इशारा यावेळी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिला आहे.