पुणे : सध्या देशात आर्थिक मंदीची चाहूल लागली आहे. मात्र, केवळ देशातच नव्हे, तर संपूर्ण जगभरातच सध्या मंदी सुरू आहे. त्याचा विद्यमान सरकारशी काहीच संबंध नाही आणि हे सुशिक्षित वर्गाला चांगले समजते. त्यामुळे महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीवर आर्थिक मंदीचा  परिणाम होणार नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे केला.

मंदीतून भाजप सरकारच मार्ग काढू शकेल, असा विश्वासही सुशिक्षित वर्गाला आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली. भाजपमध्ये प्रवेशासाठी रांग असून कोणत्याही आश्वासनाशिवाय आणि पाश्र्वभूमी तपासूनच प्रवेश देण्यात येत आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशाने भाजप-शिवसेना युतीला फायदा होण्याच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे ते म्हणाले. उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत का, या प्रश्नावर ते म्हणाले, उदयनराजे राजे असल्याने त्यांची पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याची इच्छा असल्यास ती देखील पूर्ण करू.