जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे मत

राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविषयीच्या तक्रारी व जमीन व्यवहारांविषयी ठोस पुरावे समोर आल्यानंतरच त्याविषयी पुढे काय करायचे त्याचा निर्णय घेऊ, अशी भूमिका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना मांडली. मतपत्रिकेवरील चिन्ह हा प्रकार घटनाबाह्य़ असल्याचे सांगत यापुढे मतपत्रिकेवर चिन्हाऐवजी उमेदवाराचे नाव व छायाचित्र असले पाहिजे, असेही मत त्यांनी या वेळी व्यक्त केल

िपपरीतील कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ हजारे यांना राळेगणसिद्धी येथे भेटले, तेव्हा अण्णांनी त्यांच्याशी तासभर संवाद साधला. मोदी तसेच फडणवीस सरकार, शेतक ऱ्यांचे प्रश्न व हमीभाव, दुष्काळी परिस्थिती, मंत्र्यांचे घोटाळे, महापालिकांसाठी चार सदस्यीय प्रभागरचना आदी विषयांवर ही चर्चा झाली. मारुती भापकर, प्रा. नामदेव जाधव, भगवान पठारे, नंदकुमार सातुर्डेकर आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.

या भेटीसंदर्भात, भापकर यांनी सांगितले, की खडसे यांचे दाऊदशी दूरध्वनीवरून संभाषण, भोसरीतील जमीन खरेदीचे प्रकरण, त्यांच्या स्वीय सहायकाचे लाचप्रकरण आदी आरोपांविषयी चर्चा केल्यानंतर, अण्णांनी यामध्ये लक्ष घालावे आणि जनतेच्या लढय़ाचे नेतृत्व करावे, अशी विनंती त्यांना केली. तेव्हा खडसे प्रकरणी पुरावे आल्यानंतर स्पष्ट भूमिका घेऊ, असे अण्णांनी सांगितले. याशिवाय, चार सदस्यीय प्रभागरचनेमुळे सामान्य कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान होणार आहे, याकडे अण्णांचे लक्ष वेधले. तेव्हा ते म्हणाले, की मतदान यंत्रावरचे चिन्ह हटवले पाहिजे. त्याऐवजी उमेदवाराचे नाव व छायाचित्र असावे. त्यानंतर, खऱ्या अर्थाने जनतेचे प्रतिनिधी निवडून येतील. लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी हा बदल आवश्यक आहे, असे मत हजारे यांनी व्यक्त केले.