ज्येष्ठ साहित्यिक अनंत मनोहर यांचं पुण्यात वयाच्या ९२व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अखेर शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. ते आयुष्याचा बराच काळ बेळगावमध्ये वास्तव्यास होते. बेळगावच्या राणी पार्वतीदेवी महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून सेवेत होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुलं, सुना, जावई आणि नातवंड असा परिवार आहे. अनंत मनोहर यांनी कादंबरी, कथा, ललिस, स्फुटलेखन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांत विपुल लेखन केलं आहे. शिवाय, क्रिकेटवर देखील त्यांनी लिहिलेली काही पुस्तकं विशेष लोकप्रिय ठरली. त्यांनी मोठ्या प्रमाणावर ललित लेखन केलं आहे. त्यांचे अनेक कथासंग्रह आणि कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. यामध्ये अरण्यकांड, ज्येष्ठ, सचिन तेंडुलकर समग्र चरित्र, द्वारकाविनाश अशा कादंबऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय, त्यांचे मैत्र, राब असे कथासंग्रह देखील विशेष गाजले.