पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवडमध्ये चिखली परिसरात भंगार गोडाऊनला भीषण आग लागल्याने दीडशे गोडाऊन जळून खाक झाले आहेत. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज अग्निशमन विभागाने वर्तवला आहे. चिखली परिसरात हजारो भंगार गोडाऊन आहेत. तिथे दरवर्षी आगीच्या घटना घडतात. आश्चर्यकारक बाबा म्हणजे आगीमध्ये जळून खाक झालेली दीडशे गोडाऊन हे अनधिकृत आहेत. अशी कबुली स्वतः महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. महानगरपालिकेचे अधिकारी मनोज लोणकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. अठरा तास उलटून ही आग धुमसत असून कुलिंग चे काम सुरू आहे.

शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास चिखलीतील गोडाऊनला भीषण आग लागली. आगीने रौद्ररूप धारण करत शेजारीच असलेल्या इतर गोडाऊनला देखील आग लागल्याने तब्बल दीडशेपेक्षा अधिक गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए त्याचबरोबर खासगी कंपन्यांकडून आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी १८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली आहे. सध्या त्या ठिकाणी कुलिंगचं काम सुरू असून आग धुमसत असल्याने आणखी काही तास लागल्याची शक्यता आहे. चिखलीत अगदी छोट्या गल्ल्यांमधून या दुकानांकडे जावं लागतं. त्यामुळे अग्निशमन वाहनांना त्या ठिकाणी जाण्यासाठी कसरत करावी लागली.

आणखी वाचा-‘वंचित’कडून मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द

चिखली परिसरात बहुतांश भंगार गोडाऊनची संख्या ही हजारोंच्या घरात आहे. मात्र, यावर पिंपरी- चिंचवड महानगरपालिका कारवाई करताना दिसत नाही. आज घडलेल्या घटनेमध्ये अद्याप किती नुकसान झालं याबाबत माहिती समोर येऊ शकली नाही. अशी माहिती महानगरपालिकेचे अधिकारी मनोज लोणकर यांनी दिली आहे. अनधिकृत भंगार गोडाऊनवर कारवाई करताना उदासीनता का दिसते? की आर्थिक गणिते आडवी येतात? असा प्रश्न निर्माण होतो आहे. नशीब बलवत्तर असल्याने आजच्या दुर्घटनेत कोणीही जखमी किंवा जीविहितहानी झालेली नाही.