पुणे : अनुकूल हवामान आणि लागवडीच्या क्षेत्रात झालेल्या वाढीमुळे यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाच्या उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत पन्नास लाख टनांनी वाढ होण्याची शक्यता भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आईसीएआर) भारतीय गहू आणि बार्ली संशोधन केंद्राने वर्तविली आहे.
मध्य प्रदेश, राज्यस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि बिहार ही देशातील मुख्य गहू उत्पादक राज्ये आहेत. आता गहू पीक पक्व होण्याच्या अवस्थेत आहे. गेले ४०-४५ दिवस उत्तर भारतात चांगली थंडी पडली होती. त्याचा परिणाम म्हणून गव्हाचे पीक जोमदार आले आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशात रब्बी हंगामातील क्षेत्र सरासरी तीन टक्क्यांनी वाढले आहे. २०२२ मध्ये रब्बीचे क्षेत्र ६७८.७८ लाख हेक्टर होते. यंदा त्यात वाढ होऊन ७००.९२ हेक्टरवर गेले आहे. २२.१४ लाख हेक्टरने रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. केवळ गव्हाचा विचार करता २०२२ मध्ये देशात गव्हाच्या पिकाखालील क्षेत्र ३४०.५६ हेक्टर होते. त्यात वाढ होऊन यंदा ३४१.८५ हेक्टरवर गेले आहे. सरासरीच्या तुलनेत गव्हाचे क्षेत्र १.२९ लाख हेक्टरने म्हणजे ०.३७ टक्क्यांनी वाढले आहे. याचाही फायदा गव्हाच्या उत्पादनवाढीस होणार आहे.
लागवडीखालील क्षेत्रवाढ
राज्य वाढलेले गव्हाचे क्षेत्र
राज्यस्थान २.५३
महाराष्ट्र १.२८
बिहार १.२८
छत्तीसगड ०.५२
गुजरात ०.४४
(सर्व आकडे लाख हेक्टरमध्ये. संदर्भ – कृषी मंत्रालय)
फेब्रुवारीअखेरपासून नवा गहू मोठय़ा प्रमाणावर बाजारात येईल. मध्य प्रदेशातील काही भागांत अगाप (पूर्व हंगामी) गहू केला जातो. तो बाजारात येऊ लागला आहे. यंदा उत्तरेकडील राज्यात थंडी चांगली पडली होती. परिणामी, गव्हाचा दर्जा आणि उत्पादनही चांगले राहील. – राजेश शहा, गव्हाचे व्यापारी