पुणे : केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या ‘वाहन’ प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्याने राज्यभरातील प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) वाहन नोंदणी, नूतनीकरण, मालकी हस्तांतरण, ही कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय सूचना केंद्राकडून (एनआयसी) दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

‘आरटीओ’कडून वाहनचालकांचे परवाना नूतनीकरण, वाहन परवाने, वाहन नोंदणी, रस्ता कर संकलन, मालकी हस्तांतरण, वाहनावरील बँकेचे कर्ज उतरविण्यासाठीचे प्रमाणपत्र या सेवा ‘वाहन’या प्रणालीद्वारे देण्यात येतात. या प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्याने ही कामे कोलमडली आहेत. एकाच वेळी राज्यभरातून लाखो अर्ज येत असल्याने सर्व्हरवर ताण पडल्याने ‘एनआयसी’ने गेल्या महिन्यात दहा दिवस ही प्रणाली बंद ठेवली होती. आता पुन्हा या प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्याने कामकाजावर परिणाम झाला आहे.

हेही वाचा…ओंकारेश्वर जवळचा ‘ तो ‘ पूल पाडणार ? वाहतुकीसाठी झाला धोकादायक

नागरिकांना आर्थिक भुर्दंड

वाहन परवाना नूतनीकरण, हस्तांतरण हे मुदतीत केले नाही, तर दंड आकारण्यात येतो. ‘वाहन’ प्रणालीमध्ये वारंवार अडथळे येत असल्याने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे दंड भरावा लागत आहे. ‘आरटीओ’ कार्यालयात जाऊन कागदपत्र सादर करण्यात आली, तरी तांत्रिक अडचणीचे कारण सांगण्यात येत आहे, असे वाहनधारक दिलीप सुभाने यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहन’ प्रणालीत अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार ‘एनआयसी’कडून तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. लवकरच ही सेवा पूर्ववत होईल. स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे</p>