बारामती: महाराष्ट्राच्या इतिहासात गेल्या ५१ वर्षांत जेवढा पाऊस झाला नाही. तेवढा पाऊस बारामतीत झाला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना दिली. मागील तीन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे बारामतीत अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच बारामती तालुक्यातील लिमटेक येथे निराडावा कालवा फुटल्याने कालव्यातील पाणी लोकवस्तीत शिरून अनेक नागरिकांच्या घरात घुसले. घरातील गृहउपयोगी साहित्याचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेपासूनच नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

अजित पवार म्हणाले की, काल दुपारपासून उशिरापर्यंत पाऊस पडला. बारामती, इंदापूर दौंड तालुक्यांची पावसाची वर्षाची सरासरी १४ इंच आहे. इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथे मात्र एका दिवसात १३ इंच पाऊस, तर इतर ठिकाणी ७ इंच पाऊस पडला. पावसाची परिस्थिती पाहून निराडावा कालवा बंद करण्यात आला होता. मात्र, तो बंद होण्यास ४८ तास लागतात. पाऊस जास्त असल्याने उंचवट्यावरील पाणी कॅनलमध्ये जाऊन कॅनाल फुटला.

या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करून पंचनामे सुरू आहेत. तसेच नागरिकांच्या घरात शिरलेल्या पाण्याचेही पंचनामे केले जात आहेत. नुकसानग्रस्तांना योग्य ती मदत केली जाणार आहे. तशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे यावेळी अजित पवारांनी सांगितले.

हवामान खात्याने २८ तारखेलाही ‘रेड अलर्ट’ सांगितला असून, जास्तीचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. १०० वर्षांच्या इतिहासात मे महिन्यात ठराविक काळात बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यासह इतर भागात पाऊस पडला असल्याचे पवार म्हणाले.

बारामती शहराला पावसामुळे फटका बसला असून, शहरातील ३ इमारतींना भेगा पडल्या आहेत. त्याचेही ऑडिट करण्याच्या सूचना केल्या आहेत. नागरिकांनीही केंद्र सरकार, राज्य सरकार, नगरपालिका, तालुका पंचायत यांनी केलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अनेक जण आडमुटी भूमिका घेतात. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही यावेळी पवारांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमच्या घराचे सर्व नुकसान झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंची नासाडी झाली आहे. घरातील सर्व सामान पाण्यात गेले आहे. जेवढे नुकसान झाले आहे. तेवढी भरपाई सरकारकडून मिळावी.  – नंदा सुरेश काटे, लिमटेक, बारामती