मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पावसाची जोरदार हजेरी आहे. सततच्या पावसाने मुंबई, पुण्याची दाणादाण उडवली आहे. सगळ्यांकडूनच दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच गरज असेल तरच बाहेर पडा असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळी जेव्हा बारामतीमध्ये गेले होते तेव्हा त्यांनी त्यांच्या आईची भेट घेतली. मुसळधार पावसाबाबत आई त्यांना काय म्हणाली हे त्यांनी माध्यमांना सांगितलं आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
पुणे जिल्ह्यात पावसाचं वातावरण आहेच. महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागांमध्ये पाऊस आहे. हाय अलर्ट, रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट हे देण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात असा पाऊस पडलेला नाही. माझी आई ८७ वर्षांची आहे. ती १८ वर्षांची असताना तिचं लग्न झालं या गोष्टीला आता ५१ वर्षे झाली. माझी आई मला सांगत होती की अजित ५१ वर्षांपासून मी असा पाऊस पाहिलेला नाही. सकाळपासून प्रांताधिकारी, डीवायएसपी, पाटबंधारे विभाग या सगळ्यांशी आम्ही चर्चा करत आहोत. अधिकाऱ्यांसह फिरतो आहे. बारामती, इंदापूर वगैरेची वर्षाची सरासरी १४ इंच पावसाची आहे. शेतफडगळे नावाचं गाव आहे तिथे जवळपास १३ इंच पाऊस एका दिवसात पडला. बाकी ठिकाणी ७ इंच पाऊस पडला. भरपूर पाऊस ठराविक काळात पडल्याने सगळं पाणी कॅनॉलमध्ये उतरलं. दोन कॅनॉल फुटले. आता २५० क्युसेकने पाणी सोडलं आहे. नीरा नदीला, कऱ्हा नदीला पाणी आहे. सगळ्या ओढ्यांना भरपूर पाणी आहे. शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालंय त्यांचे पंचनामे सुरु झाले आहेत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निधी देणार
शेतकऱ्यांचं नुकसान पावसामुळे झालं आहे, मागासवर्गीयांची घरं पाण्यात गेली आहेत. आम्ही त्यांनाही निधी देण्याबाबत निर्णय घेतला आहे. लोकांनाही आम्ही सांगितलं आहे चाऱ्यांच्यामध्ये अतिक्रमण करु नका. सगळाच आढावा आम्ही घेत आहोत. सध्या लाईट बंद ठेवण्यात आले आहेत. शॉर्ट सर्किट होणार नाही अशा ठिकाणचं कनेक्शन आम्ही सुरु करु असं सांगितलं आहे. जिथे पाणी आहे तिथे थोडा वेळ लागेल. २८ तारखेलाही रेड अलर्ट देण्यात आला आहे. काही जण सांगत आहेत की १०० वर्षांच्या इतिहासात इतका पाऊस विशिष्ट कालावधीत पडलेला नाही. माण, खटाव या ठिकाणीही रस्ते बंद होते. आता सगळ्या गोष्टी सुरळीत करत आहोत. नीरा, डावा कालवा फुटल्याने काही भागांमध्ये लोकांना त्रास झाला. बारामती शहरातही अनेकांना त्रास झाला आहे. सरकार, नगरपालिका, केंद्र सरकार नियम का करतं? सगळ्यांसाठीचं करतं, काहीजण आडमुठेपणाने वागतात. असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.