लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कांदा प्रश्नाने डोके वर काढले होते. या प्रश्नी कांदा उत्पादक आणि ग्राहक या दोन्ही घटकांचे समाधान होईल, असा तोडगा काढावा, असे केंद्राला कळविले होते. मात्र, समाधानकारक तोडगा न निघाल्याने लोकसभा निवडणुकीत नाशिक, पुणे, नगर आणि सोलापूर या चार जिल्ह्यांत महायुतीला फटका बसल्याची कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली.

पुणे दौऱ्यावर उपमुख्यमंत्री पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘जळगाव, नाशिक, पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी कांदा उत्पादन घेतात. कांदा प्रश्न पेटल्यानंतर कांदा उत्पादकांमध्ये नाराजी होती. त्यामुळे कांदा उत्पादक आणि ग्राहक या दोन्ही घटकांचे समाधान होईल, असा तोडगा काढण्याबाबत केंद्राला आम्ही सांगितले होते. मात्र, तोडगा न निघाल्याने उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि रावेर वगळता नाशिक, पुणे, नगर आणि सोलापूर येथील जागांवर महायुतीला फटका बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी मी दिल्ली येथे गेलो होतो. तेव्हा अमित शहा आणि पियुष गोयल यांना देखील याची कल्पना देण्यात आली.’

आणखी वाचा-राज्यसभेच्या उमेदवारी वरून छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा; अजित पवार म्हणाले, “आमच्या जवळच्या काही मित्रांनी…”

दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्याचे विश्लेषण करत आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपापली मते मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे यावर आता काही बोलणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबतच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री पवार यांनी अधिक बोलणे टाळले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भुजबळ नाराज असल्याचे धादांत खोटे

राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यावरून छगन भुजबळ नाराज असल्याचे धादांत खोटे आहे. यावर पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि स्वत: भुजबळ यांनी नाराज नसल्याचे सांगितले आहे. तरीदेखील माध्यमांतून अशाप्रकारच्या बातम्या पेरल्या जातात. आमचे फारच जवळचे, विरोधक आणि आमचा फार विचार करणाऱ्यांनी या बातम्या पिकवल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मित्र असलेले मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसोबत फडणवीस हे नाशिक येथे काळे यांच्या अस्थी विसर्जनासाठी गेले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुरुवारीच मी आमचा उमेदवार अंतीम करून अर्ज भरायला जाईल, तेथे राष्ट्रवादीचेच नेते असतील, अशी कल्पना दिली होती. निवडणूक बिनविरोध होणार होती, म्हणून भाजप, शिवसेनेच्या नेत्यांना बोलाविण्यात आले नव्हते, म्हणून ते आले नाहीत, असेही पवार यांनी स्पष्ट केले.