संजय जाधव

पुणे : विशेष मुलांना सन्मानाने जगता यावे, यासाठी पुणे जिल्ह्यातील शिरूरमधील ‘आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशन’ प्रयत्न करीत असून, संस्थेला आता स्वतंत्र इमारतीची आवश्यकता आहे. विशेष मुलांसाठी इतर सुविधा निर्माण करण्यासाठी संस्थेला वेगळय़ा जागेचीही गरज आहे.

विशेष मुलांसाठी सुरू झालेली ही संस्था सध्या भाडय़ाच्या चार खोल्यांमध्ये सुरू आहे. यातच मुलांचे वर्ग आहेत. या संस्थेला पाच गुंठे जागा मिळाली आहे. त्या ठिकाणी नवीन इमारतीची उभारणी करावयाची आहे. तिथे विशेष मुलींसाठी निवासी संस्था आणि विशेष मुलांसाठी वसतिगृह सुरू करण्याचा मानस आहे. पालक विशेष मुलांना घरी ठेवून घेण्यास तयार नसतात. त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी संस्थेने ही योजना आखली आहे.

संस्थेतील अनेक मुले ही सध्या व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करीत आहेत. ही मुले दिवाळीच्या पणत्या, आकाशकंदील, भेटवस्तू बनवितात. त्यांनी बनविलेल्या वस्तूंना मागणीही चांगली असते. मात्र, या मुलांना व्यावसायिक स्तरावर प्रशिक्षण देण्यासाठी पुरेशी जागा सध्या संस्थेत नाही. त्यामुळे इच्छा असूनही या मुलांना मोठय़ा स्तरावर काम करता येत नाही. नवीन इमारतीत कागदी पिशव्या बनविणे, पत्रावळय़ा तयार करणे असे प्रकल्प सुरू करून मुलांना स्वावलंबी बनवण्यमचा उद्देश आहे. या संस्थेत येणारी अनेक मुले २० ते २२ किलोमीटरवरून येतात. एसटी बसने येण्यास त्यांना अनेक अडचणी येतात. या मुलांसाठी स्कूल बस घेण्याचेही संस्थेचे नियोजन आहे. संस्थेने एक एकर जमीन घेऊन त्या ठिकाणी शेतीचा प्रकल्प राबविण्याचेही नियोजन केले आहे. यातून मुलांना शेतीचे ज्ञान देता येईल आणि त्यांना निसर्गाशी अधिकाधिक जोडता येईल.

हेही वाचा >>>श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती : श्रीराम मंदिर देखाव्याचे गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते उद्घाटन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष मुलांच्या पालकांसाठी समुपदेशन केंद्रही सुरू केले जाणार आहे. पालकांच्या समुपदेशनातून या मुलांच्या अनेक समस्या कमी होतात. पालकांच्या समुपदेशनातून या मुलांची स्वीकारार्हता वाढते. पालकांनी मुलांना स्वीकारल्यानंतर मुलांचे जगणेही सुकर होते. अनेक वयोवृद्ध नागरिक कुटुंबीयांनी सोडून दिल्याने रस्त्यावर भटकत असतात. अशा नागरिकांच्या निवासासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे संस्थेचे नियोजन आहे. या वयोवृद्ध नागरिकांमुळे येथील विशेष मुलांना आजी-आजोबांचे प्रेम मिळेल, असाही हेतू यामागे आहे, असे संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा राणी चोरे यांनी सांगितले.