पुणे : गतिमंदता म्हणजेच डाऊन सिंड्रोम असलेल्या पुण्यातील अनन्या सावंत आणि विघ्नेश कृष्णस्वामी या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. ते दोघेही आता सुखी संसाराचे स्वप्न रंगवत आहेत. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच विवाह असल्याचा दावा केला जात आहे.मूल वयामध्ये आल्यानंतर त्याच्या विवाहाची चिंता प्रत्येक पालकांना सतावत असते. त्यातच मूल गतिमंद असेल तर तिचे किंवा त्याचे आयुष्य़ कसे पुढे जाईल? जीवनाची वाटचाल करताना अशा मुलांचे भविष्य काय असेल, याची चिंता विशेष मुलांच्या पालकांना असते. मात्र याच सगळ्या अडचणींना तोंड देत अनन्या सावंत आणि विघ्नेश कृष्णस्वामी या डाऊन सिंड्रोम असलेल्या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. प्रेम सर्व अडथळ्यांना पार करते, ही म्हण या दोघांनीही खरी ठरवली आहे. बावधन येथे नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत हे लग्न झाले.
अनन्या लहान असतानाच ती विशेष असल्याचे कुटुंबीयांना समजले होते. त्यावेळी अनन्याच्या वडिलांना तिची काळजी वाटली. मात्र, तिच्या आईने धीर देत वडिलांची समजूत काढली. त्यानंतर दोघांनी मिळून सामान्य़ मुलीप्रमाणे अनन्याला वाढवले. तिला स्वप्न पाहायला शिकवले आणि आई-वडिलांच्या कष्टाचे चिज करून अनन्या सनशाईन चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये सहाय्यक शिक्षिका बनली.
हेही वाचा >>>प्रवास यातना! गळक्या गाड्या, झुरळे अन् अस्वच्छतेने रेल्वे प्रवासी हैराण
हेही वाचा >>>पुणे : पतीच्या अंगावर ओतले उकळते पाणी…’हे’ कारण
असा जुळला विवाह
अनन्या ही वाकड येथील सनशाईन चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये सहाय्यक शिक्षिका आहे. तर, विघ्नेश दुबईतील एका हॉटेलमध्ये फ्रंट ऑफिसर आहे. विशेष लोकांसाठी असलेल्या विवाह संकेतस्थळावर नोंदणी करून विघ्नेश याने तेजस्विता यांच्याशी संपर्क साधला होता. २०२२ मध्ये व्हिडीओ कॉलद्वारे कुटुंबे जोडली गेली. अनन्या आणि विघ्नेश यांची एकमेकांशी ओळख झाली. विघ्नेशचे कुटुंब भारतात आले आणि गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या दोघांचा साखरपुडा झाला होता.