पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. दोनवेळा नोटीस बजावूनही त्याला साधे उत्तरही देण्यात आलेले नाही, अशा ५४२ जणांनी पुढील २४ तासांत निवडणूक कामासाठी हजर न झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी दिला. हे ५४२ अधिकारी, कर्मचारी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांमधील आहेत. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच लोकसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त राव यांनी मंगळवारी जिल्हा निवडणूक शाखेच्या कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीत पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि इतर शासकीय खात्यांमधील ५४२ अधिकारी, कर्मचाऱ्यांची ‘मतदान केंद्रस्तरीय अधिकारी’ (बीएलओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत वारंवार पत्र, नोटीस पाठविण्यात आली. मात्र, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून साधे उत्तरही प्राप्त झालेले नाही, असे सांगण्यात आले. त्यावर पुढील २४ तासांत संबंधित कर्मचारी निवडणूक कामासाठी हजर न झाल्यास संबंधितांवर लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, असे आदेश विभागीय आयुक्त राव यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. हेही वाचा - बेकायदा दस्त नोंदणी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर नव्या वर्षात कारवाई, महसूल मंत्र्यांची विधिमंडळात माहिती याबाबत बोलताना उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर म्हणाल्या, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार यादी अद्ययावतीकरण, मतदार नोंदणी, मतदान केंद्र तेथील सुविधा, मतदार यंत्र निश्चिती आदींचे नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार मतदार याद्या शुद्धीकरण, अद्ययावतीकरण करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. जिल्ह्यात पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ असे चार लोकसभा मतदारसंघ असून त्यासाठी २१ विधानसभा मतदारसंघनिहाय ८२१३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक बीएलओ नियुक्त करण्यात येतो. यासाठी प्रामुख्याने महापालिकेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, लिपिक यांची बीएलओ म्हणून नेमणूक केली जाते. वारंवार पत्र, नोटीस बजावूनही अद्याप ५४२ कर्मचारी निवडणूक कामासाठी हजर झालेले नाहीत. ही बाब बैठकीत निदर्शनास आल्यानंतर विभागीय आयुक्त यांनी २४ तासांत हजर न झाल्यास कायद्यातील तरतुदीनुसार थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. हेही वाचा - ‘पीएमआरडीए’ वाल्हेकरवाडीतील गृहप्रकल्पात दिरंगाई, मुख्यमंत्र्यांची विधिमंडळात कबुली आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेने केलेल्या कामावर विभागीय आयुक्त राव यांनी समाधान व्यक्त केले. मतदारयादीतील नाव वगळण्यापूर्वी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्यात. तसेच मतदार नोंदणीसाठी प्राप्त सर्व अर्जांवर कार्यवाही करावी, असे आदेश दिले. - मिनल कळसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी