पुणे : दहावी-बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुणे महापालिकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी येत्या १ ऑगस्टपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज करण्याची मुदत असणार आहे. महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त अरविंद माळी यांनी ही माहिती दिली.

पुणे महापालिकेच्या वतीने दर वर्षी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या पुणे महापालिकेच्या हद्दीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. पुढील शिक्षणासाठी मदत व्हावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मौलाना अबुल कलाम आझाद योजनेंतर्गत १५ हजार आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अर्थसाह्य योजनेअंतर्गत २५ हजार रुपयांचे अर्थसाह्य दिले जाते. चालू वर्षासाठीचे अर्ज १ ऑगस्टपासून करता येणार आहेत. महापालिकेच्या dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर हा अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी ३१ डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या खुल्या गटातील विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी मौलाना अबुल कलाम आझाद योजनेअंतर्गत अर्थसाह्य दिले जाते. तसेच ७० टक्के गुण मिळवलेल्या पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना, ४० टक्क्यांहून अधिक अपंगत्व असलेल्या व ५५ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना तसेच कचरावेचक व बायोगॅस प्रकल्पावर काम करणाऱ्या व कचऱ्यासंबंधी काम करणाऱ्या असंघटित कामगारांच्या मुलांना किमान ६५ टक्के गुण असणे आवश्यक आहे.

यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे. अर्ज भरताना अर्जदाराने अर्ज सादर (सबमिट) न करता सेव्ह ॲज ड्राफ्ट असाच ठेवल्यास त्यावर प्रक्रिया होणार नाही, असे पालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. दहावी, बारावीनंतर शासनमान्य संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती मिळेल. अधिक माहितीसाठी १८००१०३०२२२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी मदत व्हावी, या उद्देशाने काही वर्षांपासून पुणे महापालिकेने ही शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीच्या काळात महापालिकेत सभासद विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेत ते पालिकेत जमा करत होते. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांच्या नावाने धनादेश काढले जायचे. हे धनादेश त्या भागातील सभासदांच्या माध्यमातून वितरित केले जात होते. मात्र कालांतराने यामध्ये बदल करत महापालिका प्रशासनाने थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होत आहे. दरवर्षी या योजनेसाठी पंधरा ते वीस कोटी रुपयांची तरतूद महापालिकेच्या अंदाजपत्रकात केली जाते.