पिंपरी चिंचवड: जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३४० व्या पालखी प्रस्थान सोहळ्याचे मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्ये आगमन झाले. भाजपा आमदार महेश लांडगे आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या सोबतीने पालखी रथाचे सारथ्य केले. राजकीय लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय प्रमुख यांनी वारकरी संप्रदायाची पताका अभिमानाने खांद्यावर घ्यावी, असा सुरेख संगम यानिमित्ताने पाहायला मिळाला.

भारतीय जनता पार्टी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने संत तुकोबांच्या पालखीचे भक्ती शक्ती चौक, निगडी येथे दिमाखात स्वागत करण्यात आले. अवघी उद्योगनगरी तुकोबांच्या नाम गजराने दुमदुमून गेली असून, टाळ -मृदुंगाच्या तालावर वारकरी ठेका धरत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्याच्या स्वागताची सर्व तयारी केली होती.

आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिंपरी- चिंचवड शहरात भक्तिभावाने आणि जल्लोषात दाखल झाला. शहराच्या भक्ती-शक्ती चौकात वारीचे भव्य स्वागत करण्यात आले. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पालखी सोहळ्याचे सारथ्य करत श्रद्धेचा अनोखा संदेश दिला. शहरात पालखीचे आगमन होताच, टाळ- मृदुंगांच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात वारीच्या आगमनाने वातावरण भारावून गेले. वरुणराजानेही वारीच्या स्वागतासाठी हजेरी लावली, आणि त्या सरींमध्ये हजारो वारकऱ्यांचा मेळा एकत्रितपणे आकुर्डीतील मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ झाला.

दरम्यान, भक्ती-शक्ती चौकात वारकऱ्यांसाठी विविध सेवा उपक्रम राबवले गेले. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, आरोग्य तपासणी शिबिरे, पाणी आणि फराळ व्यवस्था आणि स्वच्छतागृह व निवाऱ्याची सोय यामुळे वारकऱ्यांना अत्यंत सुलभ व सुरक्षित वातावरण मिळाले. लाडू, वॉटर बॉटल, रेनकोट, छत्री वाटप करण्यात आले. शहरातून पालखी सोहळा आकुर्डीच्या दिशेने मार्गस्थ झाला असून, हजारो भाविक, महिला, युवक आणि लहानग्यांनीही यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. पिंपरी- चिंचवड शहराच्या वतीने सोहळ्याला दिलेल्या शिस्तबद्ध आणि आदर्श सहकार्याचे वारकऱ्यांनी मनापासून कौतुक केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. वारकऱ्यांची सेवा करणं हे आमचं कर्तव्य आणि भाग्य आहे. “आषाढी वारी” ही महाराष्ट्राच्या संस्कृतीतील एक विलक्षण आणि जगात कुठेही न सापडणारी परंपरा आहे. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या – त्या फक्त पालख्या नाहीत, त्या श्रद्धेच्या गंगा आहेत ज्या लाखो वारकऱ्यांच्या पावलांमधून पंढरीच्या दिशेने वाहत असतात. वारी म्हणजे नुसती भक्ती नव्हे, ती शिस्त, सेवा, साधना आणि समर्पण यांचा संगम आहे.”, – महेश लांडगे, आमदार