पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना आझादी गौरव पदयात्रेद्वारे अभिवादन करण्यात आले.

काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत विविध जाती, धर्मातील नागरिकांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतल्याचे सांगत स्वातंत्र्यासाठी ज्ञात अज्ञात अशा सर्व शहिद योद्ध्यांना पदयात्रेद्वारे अभिवादन करण्यात आल्याचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी सांगितले. शहर काँग्रेसच्या वतीने पिंपरी-चिंचवडमध्ये ७५ कि.मी अंतर ‘आझादी गौरव पदयात्रा’चे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेची सुरूवात दापोडीपासून झाली व समारोप चिंचवडगावातील चापेकर चौकात झाला. यावेळी कदम म्हणाले, सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी लढा उभारला. या स्वातंत्र्यलढ्यात शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्याबरोबरच चापेकर बंधूंचे योगदानही आहे. स्वातंत्र्यलढ्यातील सर्व हुतात्म्यांना शहरवासियांच्या अभिवादन करण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे. तत्कालीन चळवळीत शहरातील काटे, घारे, गुजर, लूणावत, ढवळे, दरेकर, धोका, कोठारी, मिरजकर, पंडित, लुंकड, तिकोने, आतार, बंब, भन्साळी अशा अनेक कुटुंबातील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आहे.