पुणे : दुर्मीळ विकारामुळे एका बांगलादेशी तरुणाची मूत्रपिंडे निकामी झाली. त्याच्यासमोर मूत्रपिंड प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय उरला होता. मूत्रपिंडदाता न मिळाल्याने अखेर त्याच्या आईनेच मूत्रपिंड देण्याची तयारी दर्शविली. मात्र, तिचा रक्तगट वेगळा होता. पुण्यातील डॉक्टरांनी हे आव्हान पेलून या तरुणावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली.
बांगलादेशमधील ३१ वर्षीय तरुण मूत्रपिंडाच्या समस्येमुळे महिन्याभरापूर्वी नोबल हॉस्पिटल्स अँड रीसर्च सेंटरमध्ये दाखल झाला होता. तो डायलिसिसवर होता आणि त्याला आयजीए नेफ्रोपॅथी (बर्जर्स डिसीज) हा दुर्मीळ विकार होता. या विकारामध्ये मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती जास्त प्रतिपिंडे तयार करते आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याच्या मूत्रपिंडाच्या क्षमतेवर परिणाम करते. त्यामुळे कालांतराने मूत्रपिंड निकामी होते. यामुळे रुग्णासमोर प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय उरला होता. भिन्न रक्तगट असतानाही आईने दान केलेल्या मूत्रपिंडामुळे तरुणाला नवजीवन मिळाले, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
तरुणावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ११ जूनला यशस्वीरित्या करण्यात आली. आता त्याच्या क्रिएटीनची पातळी सामान्य झाली आहे. रुग्णाला आपले दैनंदिन कामकाज सुरू करण्यासाठी काही महिने विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणाऱ्या पथकामध्ये मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. अविनाश इग्नाशिअस व डॉ. राकेश शिंदे, प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. विक्रांत सातव व डॉ. शशिकांत भनगे, संवहिनी शल्यचिकित्सक डॉ. शार्दूल दाते, भूलतज्ज्ञ डॉ. संगीता चंद्रशेखर आणि डॉ. नीलेश वस्मतकर आणि डॉ. बी. डी बांदे यांचा समावेश होता.
असे झाले प्रत्यारोपण
याबाबत प्रत्यारोपण चिकित्सक डॉ. अविनाश इग्नाशिअस म्हणाले, की रुग्णाच्या कुटुंबात फक्त त्याची आई मूत्रपिंड दान करण्यासाठी उपलब्ध होती. परंतु, रुग्णाचा रक्तगट बी पॉझिटिव्ह, तर आईचा एबी पॉझिटिव्ह होता. बी पॉझिटिव्हसाठी सामान्यपणे बी किंवा ओ रक्तगट असलेले दाते असणे गरजेचे होते. अशा वेळी रुग्णाचे शरीर नवीन अवयव नाकारण्याची जोखीम असते. त्यामुळे रुग्णाच्या प्रतिपिंडाच्या बाबतीत चाचण्या घेण्यात आल्या.
त्यानंतर विशेष प्रकारची औषधे देऊन त्याच्या शरीरातील प्रतिपिंड निर्माण करण्याची क्षमता कमी करण्यात आली. याशिवाय रक्तातील प्रतिपिंडे शरीराबाहेर काढण्यासाठी प्लाझ्मा फेरेसिस ही प्रक्रिया करण्यात आली. प्रत्यारोपणाच्या पूर्ण प्रक्रियेत, शरीर नवीन अवयव नाकारणे, कमी रोगप्रतिकारक शक्ती ही जोखीम होती. यासाठी प्रक्रियेपूर्वी आणि नंतर विशेष काळजी घेण्यात आली.