भव्य मिरवणुकीने भागवत सप्ताहाला प्रारंभ
भागवत ग्रंथात केवळ कथा नाहीत, तर भगवंताच्या प्रत्येक कथांमधून प्रत्येक जीवाचा उद्धार कसा करावा, हेच सांगितले आहे. या ग्रंथातून अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेत मानवजातीला अचूक मार्ग दाखविला आहे. भागवताकडे केवळ कथा म्हणून न पाहता, या कथांचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे आणि आपण त्यातील काय आत्मसात करायचे हे आपल्याला समजायला हवे. भागवत ग्रंथ म्हणजे ज्ञानयज्ञ सोहळा आहे. त्यामुळे त्यातील तत्त्वज्ञान समजून घ्यायला हवे, असे आवाहन स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केले.सदाशिव पेठेतील रेणुका स्वरुप मुलींच्या शाळेमध्ये निनाद, पुणे आणि निनाद नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आयोजित श्रीमद् भागवत अद्वैतानंद सप्ताह सोहळ्याचे उद्घाटन स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. स्थितप्रज्ञानंद सरस्वती (माताजी) फुलगांव, मिलिंद चिटगोपीकर, किशोर खैराटकर, प्रवीण परदेशी, सुरेश पवार, विवेक खटावकर, माजी नगरसेवक उदय जोशी, शुभदा जोशी, सोहळ्याचे संयोजक संजय देशपांडे आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. स्वामी स्वरुपानंद सरस्वती म्हणाले,की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपासून वैदिक परंपरा आहे. या परंपरेमध्ये संपूर्ण समाज आणि समाजातील प्रत्येक व्यक्ती कोणत्याही जात, पंथ धर्माचा असला तरी प्रत्येक जीवाचे उत्थान व्हावे आणि हयात असेपर्यंत जीवनात परमोच्च अत्यानंदाची अनुभुती घेता यावी, यासाठी मार्गदर्शन केले आहे.