पुणे : वाहतूककोंडीमुक्त कोथरूडसाठी इनस्पेक्शन, ॲक्शन आणि एक्झिक्यूशन या त्रिसूत्रीवर काम करा, अशी सूचना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसेच कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक्तेनुसार सीसीटीव्ही आणि एआय चलानची संख्या वाढवा असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोथरुडमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी दर आठवड्याला बैठक घेणार असल्याचे पाटील यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार पाटील यांच्या निवासस्थानी शुक्रवारी बैठक पार पडली. यावेळी वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, महापालिका पथ विभागाचे अनिरुद्ध पावसकर, अतिक्रमण विभागाचे संदीप खलाटे, भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, प्रकाश बालवडकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, नवनाथ जाधव, अजय मारणे, डॉ. संदीप बुटाला यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला गेल्या बैठकीतील इतिवृत्तानुसार झालेल्या कारावाईचा आढवा पाटील यांनी घेतला. त्यामध्ये ५० वॅार्डन नियुक्तीबाबत काय कारवाई केली असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. त्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल, असे वाहतूक शाखेकडून स्पष्ट करण्यात आले. याबरोबर वाहतूक कोंडी होणाऱ्या भागात काय उपाययोजना केल्या याचीही विचारणा पाटील यांनी केली. त्यावर वाहतूक कोंडी होणाऱ्या भागांची पाहाणी करून, आवश्यकतेनुसार वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.

या बैठकीत सीसीटीव्हीचा मुद्दा ही चर्चेत आला. त्यावर पाटील यांनी वाहतूक विभागाने कोथरुडमध्ये कुठे कुठे सीसीटीव्ही लावण्याची आवश्यकता आहे, याची पाहणी करावी, लोकसहभागातून सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात येतील असे आश्वासन दिले. त्यासोबतच आवश्यकतेनुसार एआय बेस चलान प्रणालीचाही अवलंब करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बाणेर-बालेवाडी भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी याच आठवड्यात बैठक घेणार असून, विभागाने गेल्या बैठकीच्या इतिवृत्तावर कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे आदेश पाटील यांनी दिले.