पुणे : दक्षिणेकडील राज्यात यंदा मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणावर झाल्याने साठा मुबलक झाला आहे. मात्र, मागणीही कमी असल्याने मिरचीचे दर स्थिर राहणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.यंदा तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या तीन राज्यांत मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मिरचीचा शीतगृहात मोठ्या प्रमाणावर साठा करण्यात आला आहे. गुंटूर मिरचीची ६९ लाख ५६ हजार ४५० पोती, खम्मममध्ये २१ लाख ८२ हजार ४०० पोती, वरंगळमध्ये २७ लाख ५६ हजार ७६७ पोती मिरचीचा साठा शीतगृहात करण्यात आला आहे.

तीन जिल्ह्यांत मिळून एक लाख १९ हजार पोती एवढा साठा शीतगृहात आहे. ब्याडगी मिरचीची ३० लाख पोती, तसेच कर्नाटकातील अन्य जिल्ह्यांतील २० लाख पोत्यांचा साठा शीतगृहात करण्यात आला आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेशात मिरचीचा साठा मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्याने सद्य:स्थितीत मिरचीच्या दरात कोणतीही वाढ होण्याची शक्यता नाही, अशी माहिती मार्केट यार्डातील मिरचीचे ज्येष्ठ व्यापारी आणि दी फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सचे (महाराष्ट्र) अध्यक्ष वालचंद संचेती यांनी दिली.

या आठवड्यात भुसार बाजारात दीड लाख पोती मिरचीची आवक झाली. गुंटूर, खम्मम, वरंगळ येथील घाऊक मिरची बाजारात साडेसहा लाख पोत्यांची आवक झाली आहे. तेलंगणासह अन्य भागात २५ हजार पोती मिरचीची आवक झाली आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे गुंटूर, खम्मम, वरंगळ येथील बाजारपेठा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बंद राहणार आहेत. पुण्यातील मार्केट यार्डातील भुसार बाजारात मिरचीला मागणी कमी आहे. त्यामुळे मिरचीचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे, असे संचेती यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उन्हाळ्यात गृहिणींकडून वर्षभराचा मसाला तयार केला जातो. गेल्या काही वर्षांपासून तयार मसाल्यांना मागणी वाढत आहे. त्यामुळे मिरचीच्या मागणीत घट झाली आहे. दक्षिणेकडील राज्यात मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. शीतगृहात मिरचीचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळे मिरचीचे दर स्थिर राहणार आहेत.वालचंद संचेती, ज्येष्ठ व्यापारी, मार्केट यार्ड