पुणे : शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची कात्रज चौकातील सभा आज संध्याकाळी झाल्यानंतर तेथून काही कार्यकर्ते जात होते.त्यावेळी शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांची चार चाकी गाडी कार्यकर्त्यांना दिसली.त्यावर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तर काही कार्यकर्त्यांनी गाडीची काच देखील फोडली.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारताच ते म्हणाले की, असा भ्याड हल्ला करून, दगड मारून पळून जाण म्हणजे ही काही मर्दुमकी नाही.त्यामुळे प्रत्येकाने कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे. ती जबाबदारी आपल्या सर्वाची असून सर्व नियमांचे पालन झाले पाहिजे.कायदा सुव्यवस्था कोणी बिघडवण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यावर पोलिस कारवाई करतील,अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
तसेच ते पुढे म्हणाले की,राज्यात सर्वांनी जातीय,सामाजिक सलोखा राखला पाहिजे.शांतता राखली पाहिजे.यामध्ये कोणी ही आततायी पणा करत असेल पोलिस त्यावर कारवाई करतील,असे त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यानी गाड्या फोडण्याची चिथावणीखोर भाषा केली होती. त्यानंतर ही घटना घडली आहे. त्यावर ते म्हणाले की,जे कोणी चिथावणीखोर भाषा करतील,त्याची तपासणी पोलिस करतील आणि अशावर निश्चित कारवाई होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.