लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सोमवारपासून (१ मे) जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये कचरामुक्त गाव ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली. गावाच्या परिसरातील, रस्त्याच्या कडेला आणि अडगळीच्या ठिकाणी वर्षानुवर्ष साठलेला कचरा, तसेच प्लॅस्टिक असा एकूण १२५.८२ टन कचरा गोळा करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोळा केलेला कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होण्यासाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गावस्तरावर कार्यरत प्रकल्प केंद्राचे ठिकाणी प्रक्रियेसाठी पाठविण्यात आलेला आहे. गावात वर्दळीच्या ठिकाणी / सार्वजनिक बस स्थानके / धार्मिक स्थळे / ऐतिहासिक ठिकाणी / दुकाने / बाजार / पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला असतो. उघड्यावर साठलेल्या कचऱ्यामुळे सार्वजनिक आरोग्यास आणि पर्यावरणास धोका पोहोचतो. त्यामुळे १ मेपासून जिल्ह्यातील सर्वच १८४५ गावांत कचरामुक्त ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये गावातील महिला, पुरुष, शालेय विद्यार्थी यांच्या लोकसहभागातून श्रमदान घेण्यात येत आहे. ७६५ गावांमधील ८९ हजार ३०२ ग्रामस्थ या मोहिमेत सहभागी झाले असून १२५.८२ टन कचरा गोळा करण्यात आला, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.