पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात बचाव पक्षाकडून मंगळवारी न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. ‘रक्ताचे नमुने बदल प्रकरणात बनावट दस्तऐवज तयार करण्यास काही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील काही कलमे लागू होत नाहीत. आरोपींविरुद्ध करण्यात आलेले आरोप स्पष्ट नाहीत, तसेच हे आरोप सर्व आरोपींविरुद्ध लागू होत नाहीत. त्यामुळे आरोप नव्याने तयार करण्यात यावेत,’ असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयात केला.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोटारचालक अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मोटारचालक अल्पवयीन मुलाचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अगरवाल, आई शिवानी, ससूनमधील वैद्यकीय तज्ज्ञ डाॅ. श्रीहरी हाळनोर, डाॅ. अजय तावरे यांच्यासह दहा आरोपींविरुद्ध आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी खटल्याची सखोल माहिती न्यायालयासमोर मांडली होती.
त्यानंतर आरोपींच्या वकिलांकडून युक्तिवाद सुरू करण्यात आला. अल्पवयीन मोटारचालकाच्या मित्राचे रक्ताच्या नमुन्यांच्या जागी स्वतःचे रक्ताचे नमुने देणारा आदित्य अविनाश सूद याच्या वतीने ॲड. सुदीप पासबोला, ससूनमधील आपत्कालीन विभागाचे तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. श्रीहरी हाळनोर याच्या वतीने ॲड. ऋषिकेश गानू आणि रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आर्थिक व्यवहार करणारा अश्पाक मकानदार यांच्या वतीने वकिलांनी युक्तिवाद केला.
विशाल अगरवालची जामीन देण्याची मागणी
बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याने याप्रकरणात जामीन देण्याची विनंती न्यायालायकडे केली. आई आजारी असल्याचे अगरवाल याने वकिलांमार्फत न्यायालयात सांगितले. विशेष सरकारी वकील ॲड. शिशिर हिरे यांनी न्यायालयात मंगळवारी कागदपत्रे सादर केली. पुढील सुनावणी १९ जुलै रोजी होणार आहे.