पुणे : मावळातील इंद्रायणी भाताला भौगोलिक ओळख (जीआय) मिळावी, या मागणीनुसार कृषी विभागाने तातडीने तसा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी केली. दरम्यान, मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पवार यांनी सांगितले.

जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी ते बोलत होते. आमदार राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, हिरामण मांडेकर, बाबाजी काळे, ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अजित पिसाळ या वेळी उपस्थित होते. इंद्रायणी भाताला भौगोलिक ओळख (जीआय) मिळावी यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली. त्यानुसार तसा प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी सूचना पवार यांनी कृषी विभागाला केली.

‘शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर होण्यासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष त्याचा वापर करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना त्याचे फायदे लक्षात आल्यानंतर अधिक मागणी होईल. ते पाहता विविध पिकांसाठी या तंत्रज्ञानाचा अवलंब व्हावा म्हणून अधिक तरतूद करण्यात येईल. राज्यात पूर्वी मागेल त्याला शेततळे योजनेत ५० हजार रुपये अनुदान दिले जात होते. ते नंतर वाढवून ७५ हजार रुपये केले. आता त्यात वाढ करण्याची मागणी होत असून, १ लाख रुपयांपर्यंत कसे वाढविता येईल याबाबत विचार सुरू आहे,’ असे पवार यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बियाणे, कीटकनाशकांच्या बाबतीत तक्रारींकडे तत्काळ लक्ष द्यावे. बोगस बियाणे, खते, बोगस कीटकनाशके बाजारात येऊ नये यासाठी कठोर कारवाई करावी. डोंगरी भागात कृषी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तेथील पदे भरण्याची कार्यवाही करण्यात यावी आणि कृषी विभागाच्या विविध योजनांच्या लाभाची रक्कम महाडिबीटीमार्फत वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न करावेत,’ अशा काही सूचना त्यांनी या वेळी दिल्या.