पिंपरी : आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिराशेजारील भक्त निवासाचे काम तातडीने सुरू करावे. त्यासाठी नगरविकास विभागाकडून २५ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली. ‘या भक्त निवासामुळे वारकऱ्यांची सोय होणार असून, दिलेला शब्द मी पाळतो. त्यामुळे निधीची चिंता करू नये,’ अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित हरिनाम सप्ताहाला शिंदे यांनी उपस्थिती लावली. त्या वेळी ते बोलत होते. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, उत्तम जानकर, आळंदी देवस्थानाचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळाप्रमुख डॉ. भावार्थ देखणे या वेळी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, ‘इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त, स्वच्छ झाली पाहिजे अशी वारकऱ्यांची इच्छा आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून नदी स्वच्छतेचे काम करेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नदी स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची कामे सुरू झाली आहेत. नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करावे लागणार आहे. यासाठी लाखो वारकऱ्यांचे हात मदतीला लागतील. नदी स्वच्छतेची जबाबदारी पूर्णपणे शासनाची आहे. जे काय लागेल ते केले जाईल. पण, इंद्रायणी नदी स्वच्छ, शुद्ध, प्रदूषणमुक्त केली जाईल. नदी स्वच्छतेच्या कामाला या वर्षी प्रारंभ होईल, अशी ग्वाही देतो.’

‘साडेचारशे एकर जागेमधील ज्ञानभूमीचे काम टप्प्याटप्प्याने सरकारच्या मदतीने केले जाईल. महायुतीचे सरकार वारकऱ्यांमुळे आले आहे. त्यामुळे आळंदीत जे काही करायचे ते केले जाईल. ज्ञानभूमीमुळे सर्वांच्या ज्ञानात भर पडणार आहे. आळंदी आनंद देणारी भूमी आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे मला भाग्य मिळाले. गेली ७५० वर्षे ज्ञानेश्वरीच्या प्रकाशात वाटचाल सुरू आहे. मानवता, सेवाभाव आणि योगसाधनेचे महत्त्व ज्ञानेश्वरीने सांगितले आहे,’ असे शिंदे यांनी सांगितले.

जवान पाकिस्तानचे नामोनिशाण मिटवतील

पहलगाममध्ये निरपराध लोकांना मारून लाडक्या बहिणीचे सिंदूर पुसण्याचे पाप पाकधार्जिण्या दहशतवाद्यांनी केले. त्याला चोख प्रत्युत्तर भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिले आहे. हा नवा भारत आहे. आता कोणत्याही दहशतवाद्याने भारताकडे डोळे वटारून बघण्याची हिंमत करू नये, अशा प्रकारचे चोख उत्तर सीमेवर जवान देत आहेत. जवान पाकिस्तानचे नामोनिशाण मिटवतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिका निवडणुकीत महायुती कायम राहणार आहे. सरकारच्या कामाची पोहोचपावती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळणार आहे.- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री