पुणे : ‘वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण अतिशय निंदनीय आणि दुर्दैवी आहे. ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. या प्रकरणाचा सखोल तपास होईल. जे यामध्ये दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई होईल,’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिली.
‘वैष्णवी यांच्याबाबत झालेली घटना मनाला दुःख देणारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. दोषींवर कठोर कारवाई होईल,’ असेही शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
शिंदे यांनी शनिवारी वाकड येथे वैष्णवीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे या वेळी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, ‘ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. पैशांसाठी वैष्णवी यांना मारहाण झाली. सून आपल्या मुलीप्रमाणे असते. तिच्याकडे लाडकी सून म्हणून लोकांनी पाहिले पाहिजे. लोकांच्या मानसिकतेत बदल झाला पाहिजे. पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारची घटना घडणे दुर्दैवी आहे.’
‘पोलीस तपास करीत आहेत. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कोणताही मोठा अधिकारी असला आणि तो दोषी असेल तर कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. कस्पटे कुटुंबीयांना न्याय दिला जाईल,’ असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘अशा घटनांमध्ये कोणीही राजकारण आणू नये. याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये. लोकांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. तपासात कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, याची सरकार काळजी घेत आहे.’दरम्यान, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीही कस्पटे कुटुंबीयांची भेट घेतली.
नारळीकर कुटुंबीयांची भेट
ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांत्वन केले. ‘अत्यंत सोप्या भाषेत खगोलशास्त्र सामान्य माणसांमध्ये पोहोचवण्याचे काम नारळीकर यांनी केले. खऱ्या अर्थाने ते देशाचे भूषण होते. त्यांची ऊर्जा प्रत्येक पिढीला मिळाली पाहिजे. राज्य सरकार म्हणून त्यांच्या नावाला साजेसे जे करता येईल, ते केले जाईल,’ असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.