जेजुरी : ‘बाळासाहेबांचे, आनंद दिघे यांचे विचार सोडणाऱ्यांना जनतेने विधानसभा निवडणुकीत थारा दिला नाही,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. महायुती सरकारकडून कोणत्याही योजना बंद होणार नाहीत. मात्र, लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्यांना जनतेने चारी मुंड्या चीत केले, असेही त्यांनी सांगितले.

पुरंदर -हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांनी आयोजित केलेल्या आभार यात्रासभेत ते बोलत होते. उद्योगमंत्री उदय सामंत, रोजगार आणि फलोत्पादनमंत्री भरत गोगावले, आमदार विजय शिवतारे, ममता शिवतारे, रमेश कोंडे, दिलीप यादव, अतुल मस्के या वेळी उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मयूर मुळीक आणि उरुळी देवाची गावचे माजी सरपंच तात्यासाहेब भाडळे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

‘महायुती सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही योजना बंद होणार नाहीत. लोकसभा निवडणुकीत आमच्या शिवसेनेला दोन लाख मते ठाकरेंपेक्षा जास्त मिळाली. विधानसभेत १५ लाख ज्यास्त मते मिळाली. आमच्या ८० पैकी पैकी ६० जागा निवडून आल्या. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची’ अशी विचारणा त्यांनी केली. ‘बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार पुढे नेणारे खरे कोण आहे, हे सर्वांना माहिती आहे. ज्यांनी त्यांचे विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही,’ असे शिंदे यांनी सांगितले.

‘गेल्या अडीच वर्षात महायुतीला शिव्या देण्यात आल्या. मात्र, आम्ही आरोपांना कामातून उत्तर दिले. त्यामुळे महायुतीचा विजय झाला. लोकसभेनंतर विधानसभेत सरकार येणार हे समजून विरोधकांनी मंत्रिपदे अगोदरच वाटून घेतली होती. पण, चार-पाच महिन्यांतच जनतेने त्यांना जागा दाखविली. घरात बसून राज्य करता येत नाही,’ असे शिंदे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘दीड वर्षात कोणत्याही परिस्थितीत गुंजवणीचे पाणी पुरंदरमध्ये येईल. या योजनेपैकी सहा किलोमीटर लांबीचे काम झाले आहे. पुरंदर विमानतळही विकासात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पुढील पाच वर्षांत सर्व कामे पूर्ण केली जातील,’ असे विजय शिवतारे यांनी सांगितले.