संपूर्ण देशात कायदा आणि सुव्यवस्थेबाबत महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर असून त्यामुळे परराज्यातून आणि विदेशातून आपल्याकडे गुंतवणुकीचा ओघ वाढला असल्याचा अभिमानास्पद उल्लेख उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केला. राज्यातील पोलीस दलासाठी अत्याधुनिक स्वरूपाचे क्रीडासंकुल व वसतिगृहाचा प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.वानवडी येथील राज्य राखीव दलाच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या राज्य क्रीडा महोत्सवाचा समारोप शुक्रवारी फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, राज्य राखीव दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक चिरंजीवी प्रसाद, पोलीस आयुक्त रितेशकुमार यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. हेही वाचा >>>पुण्यात ‘स्टोन क्रशर’ चालकांकडून सर्वांत मोठी वीजचोरी; महिन्यात राज्यात ११ कोटीहून अधिकची वीजचोरी उघड राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सर्वोत्तम असल्याचा पुनरुच्चार करून फडणवीस म्हणाले, 'संपूर्ण देशभरात महाराष्ट्राकडे एका सकारात्मक नजरेने पहिले जाते. कायदा व सुव्यवस्थेबाबबत महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी गौरवास्पद आहे. कोरोना साथीच्या काळामध्ये पोलिसांनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावली. त्याकाळात कर्तव्य बजावताना अनेक पोलिसांना शहीद व्हावे लागले. राज्यात कायद्याचे उत्तम राज्य असल्याने आपल्याकडे होणारी गुंतवणूक वाढली आहे. भयमुक्त वातावरणामुळे राज्यात निर्धास्तपणे लोक व्यवसाय वृद्दीसाठी आणि विस्तारासाठी येत आहेत.राज्यातील पोलिसांसाठी अत्याधुनिक दर्जाचे क्रीडा संकुल व वसतिगृह विभाग उभारण्याबाबत २०१९ मध्ये प्रस्ताव पाठवण्यात आला होता. कोरोनाच्या साथीमुळे प्राधान्ये बदलली असल्याने हा प्रस्ताव रेंगाळला होता. मात्र, लवकरच संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची व मंत्र्यांची एकत्रित बैठक होणार असून त्यामध्ये हा प्रस्ताव मार्गी लावण्यात येईल. सर्व पोलिसांना अभिमान वाटेल अशा स्वरूपाच्या या संकुलाला लवकरच मूर्त स्वरूप प्राप्त होईल,असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. हेही वाचा >>>पुणे: सिकंदर, महेंद्रने प्रतिस्पर्ध्यांना लोळवले; चितपट लढती करून माती विभागातून अंतिम फेरीत राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी क्रीडा स्पर्धांमधील गुणवंत व सहभागी खेळाडूंचा गौरव केला. तसेच, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित रोखण्याबाबत पोलीस दल कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. राज्य राखीव दलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव दलाचेअतिरिक्त पोलीस महासंचालक चिरंजीवी प्रसाद यांनी एकंदर स्पर्धांच्या नियोजनाचा आढावा घेऊन आभार मानले.