पुणे : एका संगणक अभियंत्याला वारंवार पक्षाघाताचे झटके येऊ लागले. त्यामुळे एका डोळ्याची दृष्टीही गेली. हा त्रास वाढू लागल्याने त्याने विविध डॉक्टरांना दाखविले; परंतु, नेमके निदान न झाल्याने सुरुवातीला त्याला फक्त रक्त पातळ करण्याची औषधे दिली गेली. अखेर त्याला मेंदूच्या दुर्मीळ विकाराचे निदान झाल्याने डॉक्टरांनी त्याच्यावर मेंदूची बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली.

हा संगणक अभियंता ३२ वर्षीय आहे. त्याला सहा महिन्यांपासून कमी रक्तदाब अथवा शरीरातील पाणी कमी होण्यासह शरीराच्या डाव्या भागात अशक्तपणा जाणवत होता. त्याला पक्षाघाताचे झटके येत असत आणि त्यानंतर तो बेशुद्ध होई. शुद्धीवर आल्यानंतर त्याची प्रकृती सामान्य होत असे. काही काळाने झटक्यांचे प्रमाण वाढले आणि त्याच्या एका डोळ्याची दृष्टी अधू झाली. त्याने अनेक डॉक्टरांना दाखविले; परंतु, आजाराचे नेमके निदान झाले नाही. त्याला डॉक्टरांनी रक्त पातळ करण्याची औषधे दिली. मात्र, आजारात सुधारणा होत नसल्याने त्याने मणिपाल हॉस्पिटलमधील डॉक्टरांना दाखविले.

डॉक्टरांनी त्याच्या मेंदूचे सीटी स्कॅन केले. याचबरोबर त्याची लक्षणेही तपासण्यात आली. त्या वेळी त्याला मेंदूचा दुर्मीळ विकार असल्याचे निदान झाले. यात मेंदूला रक्तपुरवठा करणारी धमनी बंद होत असल्याचे निदर्शनास आले. मेंदूचा रक्तपुरवठा बंद झाल्याने त्याला पक्षाघाताचे झटके येत होते. त्यामुळे डॉक्टरांनी त्याच्यावर मेंदूची बायपास शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या मेंदूच्या मध्य भागातील डाव्या बाजूची धमनी बंद होती. मेंदूच्या दुसऱ्या भागातील धमनी मध्य भागातील धमनीला शस्त्रक्रियेद्वारे जोडण्यात आली. यामुळे रक्तपुरवठा सुरळीत झाला. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती सुधारली असून, त्याच्या डोळ्याची दृष्टी पुन्हा काही प्रमाणात परत आली आहे. याचबरोबर रुग्णाला होणारे वारंवार झटकेही थांबले आहेत. तो त्याचे कार्यालयीन कामही आता करीत आहे. ही शस्त्रक्रिया डॉ. अमित धाकोजी, डॉ. श्रेयकुमार शाह आणि त्यांच्या पथकाने केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुग्णाच्या प्रकृतीतील गुंतागुंत गंभीर होती. त्यामुळे मेंदूची बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या मेंदूला रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहावा, यासाठी त्याचा रक्तदाब सामान्यपेक्षा थोड्या जास्त पातळीवर नियंत्रित केला जात आहे. यासाठी त्याला कामयस्वरूपी रक्त पातळ करण्याची औषधे घ्यावी लागणार आहेत. यामुळे त्याच्या आरोग्यावर इतर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. तो त्याचे आयुष्य सहजपणे जगू शकणार आहे.डॉ. अमित धाकोजी, न्यूरो सर्जन