केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा पुणे : पेट्रोलियम पदार्थांची आयात कमी करण्यासाठी आणि देशातील इथेनॉल उत्पादनाला चालना देण्यासाठी येत्या सहा महिन्यात वाहन उत्पादन कंपन्यांना वाहनांच्या इंजिनात तांत्रिक बदल (फ्लेक्सिबल इंजिन) करणे बंधनकारक करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केली. वाहनांच्या इंजिनात तांत्रिक बदल केल्यास त्यात इंधन म्हणून १०० टक्के पेट्रोल किंवा १०० टक्के इथेनॉलचा वापर वाहनचालकांना करता येणार आहे. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशनच्या (डीएसटीए) ६६ व्या वार्षिक अधिवेशन कार्यक्रमात गडकरी यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले,की वाहन उद्योगातील विविध कंपन्यांनी इंजिनात तांत्रिक बदल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे असे बदल केलेली वाहने लवकरच बाजारात येतील. या वाहनांमध्ये १०० टक्के पेट्रोल किंवा १०० टक्के इथेनॉल वापरण्याचा पर्याय उपलब्ध असेल. बजाज कंपनीकडून लवकरच इथेनॉलवर चालणाऱ्या रिक्षेचे उत्पादन सुरू होईल, तर बजाज आणि टीव्हीएसकडून इथेनॉलवरील दुचाकींचे उत्पादन घेतले जात आहे. विमान उड्डाणांसाठी लागणाऱ्या इंधनात ५० टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्यात आपण यशस्वी झाल्यास नव्या क्षेत्राची बाजारपेठ खुली होईल. यासंदर्भातील बैठक दिवाळीनंतर घेण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. साखरेचा वापर इथेनॉल, सीएनजीसाठी होत असल्याने अतिरिक्त साखरेचा साठा कमी होत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले पैसेही मिळतील. ब्राझीलमध्ये साखर उत्पादन कमी झाल्याने पुढील दोन वर्षे साखर उद्योगासाठी सुवर्णकाळ असेल असे त्यांनी सांगितले.