पुणे : सामाजिक दायित्व अर्थात सीएसआरचे काम पुढे नेत असताना प्रत्येक सहभागी घटकाने सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यातून अपेक्षित असणारा विकास शक्य होईल आणि सर्वांना प्रगती करणेही सहजसाध्य होईल, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
सॉफ्टवेअर एक्स्पोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणेतर्फे (सीप) नुकतेच ‘पुणे सोशल इम्पॅक्ट डायलॉग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी आयोजित चर्चासत्रात तज्ज्ञांनी आपली मते मांडली. या कार्यक्रमाचे उद्घाटन पर्सिस्टंट फाउंडेशनच्या अध्यक्षा सोनाली देशपांडे यांच्या हस्ते झाले. सीपच्या अध्यक्षा विनिता गेरा, उपाध्यक्ष शिवराज साबळे, सीपचे सचिव आणि सीपच्या एन्व्हायर्न्मेंटल सोशल गव्हर्नन्स म्हणजेच ईएसजी फोरमचे समन्वयक विद्याधर पुरंदरे, खजिनदार आनंद रानडे, तसेच व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य अभिजित अत्रे, नितीन देशपांडे, आशुतोष पारसनीस, अमोद देशपांडे, शिवेश विश्वनाथन, तसेच उदय गुजर आदी या वेळी उपस्थित होते.
या वेळी चर्चासत्रात ‘सामाजिक दायित्व’ या विषयावर सचिन गाडगीळ, अनघा परांजपे, विद्याधर पुरंदरे, जिग्नेश ठक्कर, शिवम सिंग यांनी सहभाग घेतला. सामाजिक दायित्वाच्या क्षेत्रात काम करताना अनेक प्रकारची आव्हाने असून, कंपन्या आणि त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी मानसिकतेमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे, मत अनघा परांजपे मांडले. समाजाची गरज ओळखून काम करण्याची आवश्यकता आहे, याकडे जिग्नेश ठक्कर यांनी लक्ष वेधले. कंपन्या आणि समाज यामध्ये दरी असून, ती कमी करण्यासाठी दोघांनी एकत्र येऊन प्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे, असे विद्याधर पुरंदरे यांनी नमूद केले.