पुणे : ‘धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली आपल्याकडे निधर्मी राज्याचे प्रयत्न झाले. त्यातूनच आपल्या प्रथा आणि परंपरांबद्दल गैरसमज निर्माण करण्यात आले. सनातन म्हणजे वाईट आणि खरे पुरोगामित्व म्हणजे संस्कृतीला शिव्या देणे असा विचार पुढे आला. त्यामुळे अशा अनेक पिढ्या आहेत, ज्यांना आजही इतिहासच माहिती नाही,’ अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दांभिक पुरोगामित्वावर भाष्य केले.
प्रशांत पोळ लिखित ‘खजिन्याची शोधयात्रा’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मध्य प्रदेशचे लोकनिर्माण मंत्री राकेश सिंह, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक राजेश पांडे, स्नेहल प्रकाशनाचे रवींद्र घाटपांडे यावेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘भारतीय समाजाचे आत्मभान नष्ट करण्यासाठी आक्रमकांनी आपली ज्ञानकेंद्रे आणि प्रतिके जमीनदोस्त केली. गेली सातशे ते आठशे वर्ष त्यांच्या ज्ञानाचा पगडा आपल्यावर बसावा यासाठी पद्धतशीर प्रयत्न करत आहेत. त्यातूनच आपल्या काही पिढ्यांना चुकीचा इतिहास शिकविला गेला. म्हणून आता खरा इतिहास, परंपरा, ज्ञान आणि संस्कृती यांचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे.’
वेगवेगळ्या संशोधकांनी आपल्या संशोधनाने आपली संस्कृती भारताबाहेर गेल्याचा निष्कर्ष काढला आहे. जगातील अन्य संस्कृती नष्ट पावल्या आहेत. मात्र, पूर्वीपासून असलेली देशाची संस्कृती आजही अखंडित आहे. युरोपिय देशात जेव्हा संस्कृतीची संकल्पना स्पष्ट नव्हती तेव्हा आपली संस्कृती विकसित होती. संस्कृतासारखी भाषा विकसित होती, असेही फडणवीस यांनी सांगितले.
डॉ. गो.बं. देगलूरकर म्हणाले, ‘समाज जसा बदलत गेला तशा आपल्या संस्कृतीतील स्मृती बदलत गेल्या. मात्र, आज या संस्कृतीची समृद्धी आपण विसरलो आहोत. ब्रिटीशांनी तर आपले ज्ञान संपविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. स्वातंत्र्यानंतर तरी आपल्या विद्यार्थ्यांसमोर आपली संस्कृती येईल, असे वाटले होते. पण पहिल्या दोन शिक्षणमंत्र्यांना आपल्या संस्कृतीचे सोयर नव्हे तर सुतकच होते. आता मात्र तो अभ्यूदय होईल, याची मला खात्री आहे. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. तर, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे यांनी आभार मानले.