लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यासारख्या धर्मांध लोकांमुळे महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण होत आहे. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आझमी प्रवृत्तीला ठेचून काढावे. आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेत केली.

आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब क्रूर प्रशासक नव्हता, असे म्हटले आहे. त्यांच्या विधानाचे पडसाद अधिवेशनात उमटले. विधानसभेत बोलताना आमदार लांडगे म्हणाले, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी या धर्मासाठी मरावे कसे याचा आदर्श अजरामर केला. बलिदान दिले, त्याग समर्पण केले. ‘छावा’ चित्रपटाच्या माध्यमातून संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचला. ज्या राजाला औरंगजेबाने हाल करून मारले. त्या औरंगजेबाचे उदातीकरण करताना अबू आझमी यांच्यासारख्या धर्मांध लोकप्रतिनिधीला लाज कशी वाटत नाही’? असा प्रश्न लांडगे यांनी उपस्थित केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आझमी सारख्या धर्मांध लोकांमुळे महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण होत आहे. स्वतःच्या भावांची क्रूरपणे हत्या करून राजा बनलेला औरंगजेब आणि स्वतःच्या भावाच्या पादुका ठेवून रामराज्य करणारा भरत राजा यात फरक आहे. प्रखर हिंदुत्वाचा विचार व विकासाचा संकल्प आणि स्वप्न घेऊन काम करणारे हिंदुत्ववादी महायुती सरकार या औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या प्रवृत्तींना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, कठोर कारवाई करावी’ अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली.