पुणे : शहरातील पारव्यांची वाढती संख्या आणि पारव्यांच्या विष्ठेपासून नागरिकांना होणाऱ्या आरोग्यविषयक त्रासाची दखल पुणे महापालिकेने घेतली आहे. शहरातील ज्या भागात सर्रासपणे पारवे बसलेले असतात तेथून त्यांना हटविण्याची महापालिकेने उपाय योजना सुरू केल्या आहेत. महापालिकेने शनिवार पेठ येथील नेने घाट परिसरात पारव्यांना हटविण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे भूतदया दाखवून पारव्यांना धान्य तसेच शेव खायला देणाऱ्या नागरिकांना तसे करण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे.

पारव्यांच्या विष्टेमुळे, तसेच पिसांमुळे दम्यासारखे आजार होत असल्याने नागरिकांनी पारव्यांना खाद्य टाकू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत पारव्यांना खाद्य टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून दंड वसूल करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे.

हेही वाचा – पुणे : पीएमपी प्रवासी तरुणीशी अश्लील कृत्य, पसार झालेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

शहरातील विविध भागांत पारव्यांना धान्य टाकले जात असल्याने पारव्यांची संख्या वाढत असल्याचे समोर आले होते. पारव्यांचा त्रास नागरिकांना होत असून, महापालिका मात्र याकडे गांभीर्याने पाहत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात होती. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध करून यावर आवाज उठविला होता. पारव्यांच्या या त्रासाची दखल घेत पालिकेचा आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग आपली जबाबदारी झटकत असल्याचेही या निमित्ताने समोर आले होते. याची दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पारव्यांना धान्य टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश घनकचरा विभागाला दिला होता.

आयुक्तांनी दिलेल्या आदेशानंतर घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांची पथके तयार करून ज्या भागात पारव्यांना धान्य टाकले जाते, तेथे सकाळी आणि संध्याकाळी गस्त घातली जात आहे. पारव्यांना धान्य टाकण्यात येऊ नये, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करून पारव्यांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या आजारांची, तसेच त्रासाची माहिती नागरिकांना दिली जात आहे. पालिकेने केलेल्या जनजागृतीनंतरदेखील काही ठिकाणी नागरिक पारव्यांना खाद्य टाकत असल्याचे लक्षात आल्याने संबंधित नागरिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली. संबंधितांकडून पाचशे ते पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे.

शहरातील पंधरा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये पारव्यांना धान्य टाकले जात असलेल्या जागांचा शोध घेण्यात आला असून, तेथे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पालिकेचे कर्मचारी तेथे जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत. पालिकेच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत पक्ष्यांना धान्य टाकणाऱ्यांना पहिल्यांदा समज दिली जाते. त्यानंतरही यामध्ये बदल न झाल्यास धान्य टाकणाऱ्याकडून दंड घेतला जातो. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे या नियमाखाली हा दंड घेतला जात आहे. या नियमाखाली पाचशे ते पाच हजार रुपयांचा दंड घेण्याची तरतूद असल्याचे कदम यांनी सांगितले. यापुढील काळातही ही कारवाई सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Supriya Sule : विधानसभा निकालानंतर निवडणूक आयोगाबाबत खासदार सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य, म्हणाल्या…!

शहरातील ज्या ठिकाणी हे पारवे बसून घाण करत होते. त्या जागा स्वच्छ करण्याची मोहीम पालिकेने सुरू केली आहे. पुढील काही दिवस ही मोहीमदेखील सुरू ठेवली जाणार आहे. – संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा विभाग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या परिसरात कारवाई

वारजे माळवाडी, नदीपात्र परिसर अष्टभुजा घाट, नेने घाट परिसर तसेच स्वारगेट परिसर, सारसबाग परिसरात पारवे बसतात तेथे धान्य टाकणाऱ्यांकडून पालिकेने दंड वसूल करण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांमध्ये पाच ते सात जणांवर कारवाई करण्यात आली आहे.