पुणे : ‘स्त्री-पुरुष समानता हे धोरण केवळ कागदावरत असून, अद्यापही महिलांवर अत्याचार होत आहेत. महिलांनी आपली मानसिकता बदलायला हवी. आई-वडिलांनी मुलगा-मुलगी हा भेदभाव दूर करून हुंडा किंवा लग्नासाठी अफाट पैसा खर्च न करता पाल्यांना सक्षम बनवल्यास नक्कीच बदल घडेल,’ असा आशावाद बुधवारी बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.
बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त ‘आजची स्त्री किती सुरक्षित, किती मुक्त आणि किती सक्षम’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांची मुलाखत पत्रकार नम्रता वागळे यांनी घेतली. ‘महिला सबलीकरणाबाबत महाराष्ट्राला आज दिशा देण्याची गरज आहे.
आपण कुठल्या दिशेने चालले आहोत,’ असे सांगून दमानिया म्हणाल्या, ‘बुरसटलेल्या विचारांचे लोक अजूनही आहेत. ही बाब महाराष्ट्राला शोभनीय नाही. लहानपणापासूनच घरात मुलींना दुय्यम वागणूक दिली जाते. ही परिस्थिती बदलण्यासाठी पुरुषी मानसिकता बदलायला हवी. प्रत्येक आई वडिलांनी हुंडा, लग्नावर खर्च करण्यापेक्षा मुलीच्या शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे.’ महिलाच महिलांना त्रास देतात, हे वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात दिसून आले असल्याचेही दमानिया यांनी सांगितले.
देसाई म्हणाल्या, ‘महिला सबलीकरणासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी स्वतःच्या घरापासून सुरुवात झाली पाहिजे. कायदा असूनही हुंडाबळीची प्रकरणे वाढत आहेत. तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा नोंदविला जातो. मुलगी आणि मुलगा दोघांना समान अधिकार असले, तरी ते केवळ ते कागदावर आहेत.’
अभिनेत्री सय्यद म्हणाल्या, ‘स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजावून घेणे महत्त्वाचे आहे. तसे झाले असते, तर वैष्णवीचा मृत्यू झाला नसता. अशा प्रकरणांमध्ये महिलांनी आत्महत्या न करता लढले पाहिजे. त्यासाठी मुलींना लहानपणापासून कायद्याचे शिक्षण देणे काळजी गरज निर्माण झाली आहे.’
रूपाली चाकणकर अनुपस्थित
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या महिला वक्त्या म्हणून आमंत्रित होत्या. मात्र, काही कारणास्तव त्या अनुपस्थित राहिल्या. त्यावर ‘चाकणकर यांना आमचा वैयक्तिक विरोध नाही. मागील काही दिवसांपासून आयोगाचे काम दिसत नाही. आज त्या आल्या असत्या, तर आयोग महिलांसाठी काय करू शकते, त्यांचे अधिकार काय आहेत, याची चांगलीच माहिती मिळाली असती,’ असा उपरोधिक टोला देसाई यांनी लगावला.